चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू श्रीराम अयोध्येला परत आले, त्या वेळी प्रजेने दीपोत्सव केला. तेव्हापासून दीपावली उत्सव सुरू आहे. दिवाळी भारतातच नव्हे, तर विदेशातही जोमाने साजरी केली जाते. यावेळी शुक्रवार, १० ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे. त्या निमित्ताने धनत्रयोदशी आणि या दिवशी येणारी धन्वंतरि जयंती कशी साजरी करावी, हे जाणून घेऊ या.
आश्विन वद्य त्रयोदशीच्या दिवशी धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे.व्यापारी देखील आपल्या तिजोरीचे पूजनही याच दिवशी करतात. हा दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो; कारण धनप्राप्तीसाठी श्री लक्ष्मीदेवीचे पूजन केले जाते. व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे असते. नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या धनत्रयोदशीच्या दिवशीच आणून त्यांचे पूजन करून वापरात आणल्या जातात.
साधनेसाठी अनुकूलता आणि ऐश्वर्य प्राप्त होण्यासाठी या दिवशी धनलक्ष्मीची पूजा करतात. वर्षभर योग्य मार्गाने धन कमवून वार्षिक उत्पन्नाचा १/६ भाग धर्मकार्यासाठी अर्पण करावा, असे शास्त्रांमध्ये सांगितले आहे. प्रदोष काळात पूजा सायंकाळी ५. ४७ वाजेपासून ७. ४५ पर्यंत करावी. यावेळी यमदीप लावणेही इष्ट ठरेल.
या दिवशी यमदीपदानाला विशेष महत्त्व आहे. अकाली मृत्यू कुणालाच येऊ नये, याकरिता धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेचा तेलाचा दिवा (काही जण तेरा दिवे लावतात) करून तो घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावावा. एरवी दिव्याचे तोंड दक्षिणेस कधीही नसते. फक्त या दिवशी तेवढे दिव्याचे तोंड दक्षिणेस करून ठेवावे. त्यानंतर पुढील प्रार्थना करावी – ‘धनत्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्याच्या दानाने प्रसन्न होऊन त्याने मृत्यूपाश आणि दंड यातून माझी सुटका करावी.