दिवाळीचा माहोल पाहायला मिळत असून, शहरं, नगरं, गावं आणि संपूर्ण देश सजला आहे. अशा या आनंदपर्वाच्या निमित्तानं मुंबईतही वेगळाच लखलखाट पाहायला मिळत आहे. मुंबई म्हटलं की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आयोजित केला जाणारा दीपोत्सवही आकर्षणाचाच विषय. अशा या दीपोत्सवाचं उदघाटन गुरुवारी करण्यात आलं.
दादरच्या शिवाजी पार्क येथे या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. जिथं मैदान परिसरामध्ये सुरेख रोषणाईही केल्याचं पाहायला मिळालं. यंदाच्या दीपोत्सवाच्या उदघाटनासाठी हिंदी कलाजगत गाजवणारी पटकथा लेखकांची जोडी अर्थात ज्येष्ठ कलावंत सलीम-जावेद यांची उपस्थिती पाहायला मिळाली. साचेबद्ध विचारांना शह देणाऱ्या जावेद अख्तर यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करत काही सुरेख विचार सर्वांपुढे ठेवले.
हिंदुत्त्व, भक्ती या साऱ्यापलीकडे जात संस्कृती आणि वासरा या गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला. चित्रपटांच्या दुनियेतील काही गोष्टींचा उलगडा करणाऱ्या जावेद अख्तर यांनी यावेळी ‘राम’ हा विचार एका वेगळ्या दृष्टीकोनातून मांडला. ‘राम किंवा सीता हे फक्त हिंदूंचाच वारसा आहेत, त्यांच्याच धार्मिक अस्मितेचा मुद्दा आहेत असं नाही, मी असं समतच नाही.
या देशातील प्रत्येक नागरिकाचे, पृथ्वीवरील स्वत:ला हिंदुस्तानी समजणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी रामायण हा एक सांस्कृतिक वारसा आहे. रामायण किंवा महाभारताविषयी माहिती नाही असा एकही हिंदुस्तानी सापडणार नाही शकत नाही. कारण हाच आपला इतिहास, आपली संस्कृती आणि आपली ओळख आहे’, असं अख्तर यांनी स्पष्ट केलं.