नवी मुंबईः प्रतिनिधी
भिमा कोरेगाव घटनेनंतर ज्यांनी रस्त्यावर उतरून सरकार विरोधातला राग व्यक्त केला. त्यांना सोडविण्यासाठी जे जामिन राहीले. वकीलांनी मोफत सेवा दिली. आपल्या समाजावरील अन्याया विरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करावा असे कोणत्याही समाजधुरीणांना वाटले नाही. त्यांना जे जमलं नाही ते जयभिम ग्रुपच्या रिक्षा चालक संघटनेनं केल असून त्यांचा सन्मान करावा तेवढा कमीच असल्याचे गौरवौद्गार काढत चळवळ चालविण्यासाठी विचारवंताबरोबरच आर्थिक सुबत्तेची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी जयभिम ग्रुपच्या वतीने आयोजित सामाजिक सलोखा परिषदेत व्यक्त केले.
भिमा कोरेगाव घटनेचा जाब विचारण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले. त्यांच्यावर दंगलीचे गुन्हे सरकारने दाखल केले. त्यामुळे त्यांना सोडविण्यासाठी अनेक लोक जामिन झाले. त्यांच्या करीता मोफत वकीलांची टिम उभी राहीली. त्या आंबेडकरी स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा क्रांतिकारक असा ऊल्लेख करीत त्या पुढे म्हणाल्या की, आपल्या समाजात अनेक मान्यवर आहेत कोणी आमदार,खासदार, उद्योगपती, विचारवंत राजकारणी असे मोठमोठे लोक असताना जे समाजासाठी रस्त्यावर उतरले. त्यांचं कौतुक करावं असं कोणाला का बरं वाटलं नाही. पण जे या रीक्षावाल्यांना कळालं ते त्यांना का बरं कळू नये असा उपरोधिक सवालही आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना केला.
आपण रस्त्यावरच्या लढाया जिंकतो. पण कायद्याच्या लढाईत हारतो त्या करीता आता आपल्या पासून दूर असलेली राजकीय गणितं सोडवावी लागतील. केवळ भावनिक होऊन चालणार नाही. तर त्या करीता लागणारे थिंक टॅंक आणि अर्थिक सक्षमिकरण केलं पाहिजे. त्याकरीता वेळ लागला तरी चालेल.या निमित्ताने नवी मुंबईत रिपाइं(ए), भारिप बहुजन, बसपा, बीआरअसपी, बीएमपी असे सर्व पक्ष एकत्र आले होते.मात्र असे नुसते इथे एकत्र येऊन चालणार नाही. तर राखीव मतदार संघात आंबेडकरी चळवळीचा एकच उमेदवार दिला पाहिजे. तसेच अजेंडा राबविण्यासाठी झेंडा मजबूत करावा लागेल पण त्याकरीता अर्थिक सुबत्ताही असायला हवी असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
मराठ्यांना आरक्षण दिले पाहिजे याच्यात दुमत नाही. पण प्रस्तापित आणि विस्तापित मराठा असे वेगळेपण करायला नको का? असा सवाल करून त्या पुढे म्हणाल्या की, मराठा मोर्चाने सत्ता केंद्र हालविले. कारण हातची सत्ता गेल्याने नेतृत्वहिन मोर्चे काढले. या मोर्चातून मराठा नेतृत्व उभे राहीले असते तर प्रस्तापित नेतृत्वाला धोका पोहोचला असता. परंतु ज्यांनी त्यांनी आपापली सोय करून ठेवली आहे. गणेश नाईक नंतर संजीव नाईक, संदिप नाईक तसेच शरद पवार, बाळ ठाकरे, गोपीनाथ मुंडे अशा अनेक राजकीय वारसा चालविणाऱ्यांनी त्यांची सेंकड जनरेशन तयार केली. तर आपल्यात कांशीराम नंतर मायावती, पण त्यांच्या नंतर कोण, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांच्या नंतर कोण असा सवाल करत त्यांनी वायईएस अर्थात युथ ईमरजन्सी सर्व्हिस युवा तात्काळ सेवा गावागावात तयार करा आणि अडल्या नडल्या समाज बांधवाची सेवा करा अन्याय अत्याचार विरोधात तात्काळ मदतीला धावून गेले तर सोशल इंजिअरींग होईल अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.