Breaking News

सहा महिन्यात समृध्दी महामार्गाचा खर्च ७ हजार कोटींनी वाढला मंत्रिमंडळ बैठकीत वाढीव खर्चावर शिक्कामोर्तब

मुंबई : प्रतिनिधी

नागपूर मुंबईला जोडणाऱ्या समृध्दी महामार्ग प्रकल्पाच्या मुर्हुर्तास दिवसेंदिवस उशीर होत आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून ३६ हजार कोटीं रूपयांवरून या प्रकल्पाची किंमत ५६ हजार कोटी रूपयांवर पोहोचली आहे. मध्यंतरीच्या काळात ४९ हजार कोटींवर अंतिम करण्यात आला. मात्र ६ महिन्यातच यात पुन्हा सहा ते सात हजार कोटी रूपयांनी वाढला असून राज्य मंत्रिमंडळानेही त्यास मान्यता दिली.

समृध्दी महामार्ग प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला. त्यावेळी या प्रकल्पाचा खर्च ३६ हजार कोटी रूपयांवर होता. मात्र त्याचा सर्व्हे, आर्थिक निधी उभारणीचे नियोजन आणि जमिन अधिग्रहण आदी कामांमुळे या प्रकल्पाचा खर्च ३६ हजार कोटीं रूपयांवरून ४५ हजार कोटींवर पोहोचला. परंतु त्यासही उशीर होत असल्याने ४५ हजार कोटीं रूपयांचा खर्च पुन्हा ४९ हजार कोटींवर पोहोचला होतो. या किंमतीतच संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे राज्य सरकारच्या पातळीवर सुरवातीला निश्चित करण्यात आल्याचे एमआसआरडीसीतील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.

मात्र या प्रकल्पाच्या मुळ आराखड्यात पुन्हा बदल करत हा संपूर्ण महामार्ग उन्नत पध्दतीचा करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे प्रकल्पाच्या खर्चात एकदम सहा ते सात हजार कोटी रूपयांनी वाढ झाली. आजस्थितिला या प्रकल्पाची किंमत ५६ हजार कोटींवर पोहोचली. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला जवळपास ७५० कि.मी अर्थात १४०० कि.मी. अंतराची नव्याने संरक्षण भिंत उभारण्यात येणार आहे. त्यामुळे त्याचाही खर्च वाढणार आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या वाढीव आणि अंतिम खर्चास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. परंतु या वाढीव खर्चाचा भार राज्य सरकार कसा सोसणार असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत असल्याचे त्यांनी सांगितले.

समृध्दीच्या निविदा प्रक्रियेतून चीन बाहेर

समृध्दी महामार्ग प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत दक्षिण कोरियाबरोबरच जपान, चीन या देशातील तीन बड्या कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. यापैकी चीनच्या कंपनीला संरक्षणाच्या मुद्यावरून केंद्र सरकारने मान्यता न दिल्याने चीनच्या कंपनीला निविदा प्रक्रियेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *