येत्या ९ जूनपासून राज्यातील सर्व शाळा सुरु होत असतानाच २०२१ – २२ या शैक्षणिक वर्षासाठी १५ टक्के फी कपातीचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश शालेय शिक्षण मंत्री प्रा वर्षा गायकवाड यांनी विभागस्तरावर शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, पालघर या विभागातील शाळांसाठी आदेश देण्यात आला आहे.
१२ ऑगस्ट २०२१ रोजी शालेय शिक्षण विभागाने १५ टक्के कपातीचा निर्णय घेतला होता. मात्र या विरोधात शाळा संस्थाचालक न्यायालयात गेल्याने अनेक शाळांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. आता पुन्हा एकदा शिक्षण विभागाच्या विविध विभागांनी पंधरा टक्के शुल्क कपातीची अंमलबजावणी करावी व ज्या विद्यार्थ्यांनी गेल्यावर्षी पूर्णपणे शुल्क भरले आहे त्यांना पुढील वर्षीच्या शुल्कात तर रक्कम समायोजित करावी, असे आदेश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.
महाराष्ट्रातील काही भागात शाळा सुरू झाल्या आहेत तर काही ९, १३ जून आणि १५ जून रोजी सुरू होतील. शााळा सुरु करताना अत्यंत सावधगिरी बाळगली जाईल. तर नव्या शैक्षणिक वर्षासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लवकरच राज्य सरकार नियमावली जारी करणार असल्याचेही त्यांनी सांगत महाराष्ट्र सरकारने शाळांच्या शुल्कात १५ टक्के कपात केल्याची घोषणाही त्यांनी केली.
कोविडची प्रकरणे वाढत असली तरी योग्य काळजी घेऊन शाळा सुरू केल्या जातील. शाळांमध्ये मास्क वापरणे अनिवार्य करायचे की नाही आणि शाळांसाठी काही निर्बंध ठरवायचे का, याबाबत लवकरच निर्णय होईल असेही त्या म्हणाल्या.