Breaking News

आया बहिणी सुरक्षित नसतील तर राज्यात राष्ट्रपती राजवट जळगांव प्रकरणावरून सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्याची वेळ आली असून जळगाव येथील वसतिगृह प्रकरणांवरुन संताप व्यक्त करताना सुधीर मुनगंटीवार यांनी सरकार काहीच कारवाई करत नसल्याचा आरोप करत आमच्या आया-बहिणीची थट्टा होणार असेल आणि त्या सुरक्षित नसतील तर राष्ट्रपती राजवट हा एकच मार्ग असल्याचे म्हणत त्यांनी विधानसभेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुनगंटीवार यांच्या विधानावर आक्षेप नोंदवत राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुनगंटीवार हे धमकावत असल्याचा आरोप केला.

जळगांवमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंबंधी तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलीस कर्मचारी आणि वसतिगृहाबाहेरील काही पुरुष सहभागी असल्याचा आरोप आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेशही दिले आहेत. दरम्यान अधिवेशनात या प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बुधवारी खडाजंगी झाली. भाजप आमदार यांनी देवयानी फरांदे यांनी विधान सभेत प्रश्न उपस्थित करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.

मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणांची माहिती घेवून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावर भाजप सदस्यांचे समाधान झाले नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार आक्रमक होत सरकार संवेदन आहे की नाही? असा सवाल केला. दरम्यान सुधीर मुनगंटीवार धमक्या देत आहेत. निवडून आलेले सरकार बहुमताच्या जोरावर चालत आहे. काम करत असताना आता राष्ट्रपती राजवट लागेल अशी धमकी देणे योग्य नाही. असे भाष्य करु नये अशी समज देण्याची मागणी मलिक यांनी केली.

राष्ट्रपती राजवट लावण्याचा अधिकार केंद्राला असू शकतो. पण जेव्हा कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडते, सरकार काम करु शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली तर राज्यपाल शिफारस करतात. हल्लीच्या काळात राजकीय उद्दिष्ट ठेवून कामकाज सुरु आहे. या सभागृहाचा उपयोग करुन धमकी देणे योग्य नाही. हे रेकॉर्डवरुन काढावे अशी विनंती आहे असेही ते म्हणाले. दरम्यान भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी जळगांव जिल्हयातील दलित तरूणाने पोलीस अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. त्या पोलीस अधिकाऱ्यांस निलंबित करा अशी मागणी केली. त्यावर चौकशी करून त्यावर कारवाई केली जाईल असे उत्तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.

फडणवीसांनी मांडली बाजू

देशातील लोकशाहीत सरकार योग्य काम करत नाही, ते बरखास्त करा असे म्हणण्याचा कोणालाही अधिकार आहे. तुम्हाला वाईट वाटले असेल तर सोडून द्या. पण ते असे का म्हणाले याच्या मागचे कारण म्हणजे व्हिडीओ क्लिप आली. नुसती बातमी असती तर वेगळी गोष्ट आहे, पण त्या मुलीला पोलीस नग्न करुन नाचवत आहे. त्याची जी व्हिडीओ क्लिप आली आहे ते गंभीर आहे. आमची अपेक्षा इतकीच आहे की, आपल्यावर विश्वास आहे पण तात्काळ कारवाई करावी यासाठी ही तळमळ असल्याची बाजू विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मांडली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *