राज्याच्या राजकीय वर्तुळात महत्वाच्या घडामोडी समोर येत आहेत. शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय लवकरच लागला जाणार असल्याची चिन्हे सध्या दिसत आहे. अपात्रते बाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी योग्य वेळेत घ्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून याबाबत दिरंगाई होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करीत ताशेरे ओढले. तरीही आपण कोणत्याही परीस्थितीत घाईत निर्णय घेणार नाही अशी भूमिका अध्यक्ष नार्वेकर यांनी घेतल्यानंतर त्यांना अचानक दिल्लीला जावे लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानूसार विधानसभा अध्यक्षांनी चालविलेल्या दिरंगाई बाबत शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी होऊन एकप्रकारे विधानसभा अध्यक्षांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय तातडीने घेण्याचे अप्रत्यक्ष निर्देश दिले होते. एका आठवड्यात सुनावणी घेऊन दोन आठवड्यात अहवाल सादर करा असे निर्देश दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मी कोणत्याही परिस्थितीत घाईत निर्णय घेणार नाही,अशी भूमिका घेतली होती. परंतू, गुरुवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अचानक दिल्लीला दिशेने रवाना झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दिल्लीत राहुल नार्वेकर दिल्लीत भाजपश्रेष्ठींशी शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत चर्चा करणार का? त्यांना नेमक्या काय सूचना दिल्या जाणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आता शिगेला लागली आहे. आमदार अपात्रतेबाबत निर्णयाच्या दृष्ट्रीने विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची ही दिल्ली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या १६ आमदारांना पक्षांतरबंदी कायद्यातंर्गत अपात्र ठरवल्यास एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागेल की आणखी काही पर्याय आहेत का, याकडेही अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. त्यामुळेही अध्यक्षांची दिल्ली भेट महत्वाची मानली जात आहे.
दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी दिल्लीवारीबाबतच्या सर्व शक्यता फेटाळून लावत माझा दिल्ली दौरा हा पूर्वनियोजत असल्याचे सांगितले. आमदारांच्या अपात्रते संदर्भात निर्णयाबाबत कोणताही दिरंगाई होणार नाही आणि घाईही केली जाणार नाही, तसेच कोणताही चुकीचा निर्णय घेतला जाणार नाही घटनेच्या चौकटीत बसणारा निर्णय घेतला जाईल, असेही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.
राहुल नार्वेकर यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत बोलताना प्रतिक्रिया संजय शिरसाट म्हणाले, आमच्या दिल्लीतील वकीलाशी चर्चा करणं महत्त्वाचं आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयाचा नेमका आदेश काय आहे? हेही समजून घ्यायला पाहिजे. यासाठी राहुल नार्वेकर दिल्लीला गेले आहेत. त्यात विशेष काही नाही. सर्वोच्च न्यायालयाने ही कारवाई थोडी जलद गतीने करा. याचा अर्थ प्रक्रिया डावलून कारवाई करा, असं नाही. त्यामुळे प्रक्रियेप्रमाणे कारवाई करावी लागेल यासाठी विधानसभा अध्यक्षांसाठी जेवढा वेळ लागणार आहे, त्यासंदर्भात दिल्लीत चर्चा होईल, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.