सर्वपक्षीय बैठकीत भाजपचा प्रतिनिधी उपस्थित राहिला असता तर त्यांची भूमिका राज्य सरकारला समजली असती. परंतु सदैव शंका उपस्थित करणारी भाजपा कुठल्याच प्रश्नावर सामोपचाराने मार्ग काढण्यास इच्छुक नाही हे त्यांच्या अनुपस्थितीमुळे सिद्ध झाले आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली.
राजद्रोहाचा आरोप ‘हनुमान चालीसा’ म्हणण्यावर केला गेला हा शोध सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी कसा लावला हा निश्चितच संशोधनाचा विषय आहे अशी खोचक टीका करत देवेंद्र फडणवीस यांनी ज्यापद्धतीने हनुमान चालीसाचे पठण केले त्याचपद्धतीने भारतीय राज्यघटनेची उद्देशिका नक्कीच त्यांच्या लक्षात असेल याची मला पूर्ण खात्री आहे असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.
देवेंद्र फडणवीसांनी अशाच जोशात राज्यघटनेच्या उद्देशिकाचा अर्थ सर्व माध्यमांसमोर आम्हा सर्व भारतीयांना समजावून सांगावे अशी विनंतीही त्यांनी केली.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये भाजपचा एकही प्रतिनिधी का आला नाही असा प्रश्न महाराष्ट्राची जनतेला पडला असल्याचे ते म्हणाले.
राज्यातल्या अनेक प्रश्नांवर आतापर्यंत संवादाच्या माध्यमातून तोडगा काढावा ही भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे. कोरोना काळातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली होती, याची आठवण करून देतानाच धार्मिक स्थळावरील भोंगे या मुद्द्यावरून राज्यातले सामाजिक वातावरण बिघडू नये या उद्देशाने बोलावलेल्या सर्व पक्षीय बैठकीला भाजपाचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते ही गंभीर बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, आज भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हनुमान चालिसा म्हणाल्याने तुम्ही राजद्रोहाचा आरोप लावणार असाल तर हिंमत असेल तर खुशाल आमच्यावर गुन्हा दाखल करावा असे आव्हान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देत हनुमान चालिसाचे पठण करून दाखविले.