सत्तास्थानी असताना शिवसेनेतील फुटीनंतर एकाबाजूला पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठकांचा सपाटा लावला आहे. तर दुसऱ्याबाजूला आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून राज्यातील विविध भागात जात महाराष्ट्राचा दौरा सुरु केला आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना कोणाची याचे आणि स्थानिक पातळीवरील शिवसैनिक कोणासोबत याबाबत उत्सुकता निर्माण झाली असताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले की, शिवसेना संपली म्हणणाऱ्यांनी जरा इथं एकदा पहावे, आज उपस्थित असलेले कार्यकर्त्ये ही माझी ताकद आहेत. वर्षावरून निघालो असलो तरी मातोश्रीवर परतल्यावर मला माझी शक्ती परत मिळाली. शिवसैनिक ही माझी खरी ताकद आहे. आज अरविंद सावंत यांना किशोरी पेडणेकर यांनी गणपती बाप्पाची मुर्ती दिली. मी गणरायाला साकडं घालतोय की तुझ्या आगमनाआधी हे संकट आणि आरिष्ट्य मोडून शिवसेनेचा भगवा पुन्हा महाराष्ट्रावर फडकू देत. आता खरा भगवा कोणता दाखविण्याची वेळ आली असल्याचे सूचक वक्तव्यही केले.
शिवडी येथील शिवसेना शाखेच्या उद्घाटनासाठी उध्दव ठाकरे आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
शिवसेनेची ताकद काय आहे ते आता जगाला समजू द्या. माझ्या वाढदिवसाला मला पुष्पगुच्छ भेट म्हणून नकोत. तुमच्या सह्यांचे शपथपत्राचे गठ्ठे माझ्याकडे आले पाहिजेत. हेच माझ्या वाढदिवसाचं गिफ्ट समजेन असे आवाहनही त्यांनी यावेळी शिवसैनिकांना केले.
विधानसभा निवडणूकीच्या वेळी जे ठरलं होतं ते जर केलं असते तर आज तुम्हाला मनावर दगड ठेवून आज जे काय करायला लागलं आहे. ते झालं नसतं आणि कोणात्या तरी भाजपाच्या दगडाला अडीच वर्षासाठी शेंदूर लागला असता. आज तुमच्या मनावर दगड पडलेला आहे. मग तेव्हा का नाही सांगितलं की हेच आमचं ठरलेलं होतं असा खोचक टोलाही त्यांनी चंद्रकांच पाटील यांच्या वक्तव्यावरून भाजपाला लगावला.
आजपर्यंत अनेकदा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला. पण आजचा तो प्रयत्न आहे तो फोडण्याचा नाही, तर शिवसेना संपविण्याचा प्रयत्न सुरु आहे. शिवसेना आणि ठाकरे हे नातं तोडायचे आहे. पण नातं जर तोडायचे असेल तर हे जे स्वत:ला मर्द समजत आहेत. हे बंडखोर नाहीत ते हरामखोर आहेत. त्यांनी हरामीपणा केला आहे. तुमच्यात एवढी जर मर्दुमुकी असेल तर निवडणूकीला सामोरे जा असे आव्हानही त्यांनी बंडखोरांना यावेळी दिले.