नाशिकमधील तांबे पिता-पुत्रांनी केलेल्या बंडाला भाजपाने दिलेली साथ आणि निवडणूकीच्या रिंगणात महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी पाटील या पराभवाच्या छायेत आहेत. तसेच निवडूण आल्यानंतर सत्यजीत तांबे हे भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना ऊत आलेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाशिकच्या जागेवर सत्यजीत तांबेच निवडूण येणार असल्याचा अंदाज व्यक्त करत महाविकास आघाडी आणि शिवसेना उमेदवार शुभांगी पाटील यांच्या पराभवाबाबत एकप्रकारे भाष्य केले. त्यामुळे शिवसेनेने पाठिंबा दिलेला उमेदवार पडणार असल्याचे संकेत अजित पवार यांनी दिले.
तसेच सत्यजीत तांबे हे विजयी झाल्यानंतर भाजपामधील जातील असे वाटत नसल्याचे स्पष्ट करत ते काँग्रेसमध्येच राहतील असा अंदाजही व्यक्त केला.
नाशिकमधील निवडणूकीबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी वरील वक्तव्य केले.
यावेळी पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, काँग्रेसने जर सत्यजीत तांबेंना उमेदवारी दिली असती, तर असं काही घडलंच नसतं. तसेच सत्यजीत तांबेंनी नाईलाजास्तव अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरल्याचंही नमूद केलं.
अजित पवार म्हणाले, खरंतर माझ्यासारख्या माणसानं काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाबद्दल बोलणं उचित नाही, परंतु एकेकाळी सत्यजीत तांबे युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम करत होते. ते पक्षाचा अतिशय जवळचा, बांधिलकी असणारा चेहरा होते. काँग्रेसने जर सत्यजित तांबेंना उमेदवारी दिली असती, तर असं काही घडलंच नसतं. शेवटी नाईलाजास्तव त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून उभं राहावं लागलं. त्यामुळे नंतरच्या काळात वेगळ्या प्रकारचा निर्णय झाल्याचे स्पष्ट केले.
अजित पवार पुढे म्हणाले, सत्यजीत तांबेंचे वडील, आजोबा यांच्यासह आख्खं घराणं काँग्रेसच्या विचारांचं आहे. त्यामुळे माझा अंदाज आहे की, सत्यजीत तांबे आता आघाडीवर आहेत आणि तेच निवडून येतील. निवडून आल्यावर ते योग्य तो निर्णय घेतील असेही सांगितले.
दरम्यान, नाशिकमध्ये सत्यजीत तांबे आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत त्यांना १५७८४ मतं मिळाली, तर शुभांगी पाटील यांना ७ हजार ८६२ मतं मिळाली. त्यामुळे सत्यजीत तांबे ७ हजार ९२२ मतांनी आघाडीवर आहेत.