नुकतेच मध्य प्रदेशातील भोपाळ येथील भाजपाच्या बुथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलतना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे नाव घेत टीका केली होती. त्यानंतर आज शरद पवार यांचे पुतणे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी १० ते १२ आमदारांना सोबत घेत थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून राजभवनात आज दुपारी शपथ घेतली. त्यासंदर्भात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी शरद पवार यांना यासंदर्भात विचारले असता पवारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करत खोचक टोला लगावला.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, दोन दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधानांनी एक स्टेटमेंट केलं होतं. ते काँग्रेस पक्षाच्या विरोधात आणि राष्ट्रवादी काँग्रेसविषयी केलं होतं. त्यावेळी त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष आहे. हे सांगत असताना त्यांनी राज्य सहकारी बँकेचा उल्लेख केला. त्याचबरोबर सिंचनासंदर्भात जी तक्रार होती त्याचा उल्लेख केला. हा उल्लेख त्यांनी केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारात सहभागी आहे असा जो उल्लेख केला. मला आनंद आहे की आज मंत्रिमंडळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातल्या काही सदस्यांना शपथ दिली. याचा अर्थ त्यांनी केलेले आरोप हे काही सत्य नव्हते. त्यांनी केलेल्या आरोपांमधून सगळ्यांना मुक्त केलं त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. असं म्हणत शरद पवार यांनी अजित पवारांच्या शपथविधीवर पहिली प्रतिक्रिया व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोचक टोलाही लगावला.
तसेच पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, प्रश्न आता दुसरा आहे की आमचे काही सहकारी जी पक्षाची भूमिका आहे त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली. ६ जुलैला मी महाराष्ट्रातल्या पक्षाच्या काही प्रमुख लोकांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत काही प्रश्न उपस्थित केले होते. संघटनात्मक बदल करण्याचे काही प्रश्न होते त्याचा विचार करणार होतो. पण त्यापूर्वीच काही सहकाऱ्यांनी पक्षापासून एकदम वेगळी भूमिका घेतली. आम्हीच पक्ष आहोत असं त्यांनी सांगितलं. माझं स्वच्छ मत असं आहे की पक्षाचे काही सदस्य, खासकरुन विधिमंडळाचे कितपत वेगळी भूमिका घेतली आहे याचं चित्र दोन-तीन दिवसांत लोकांसमोर येईल.
ज्यांची नावं आली आहेत त्यातल्या काही लोकांनी माझ्याशी संपर्क साधून आम्हाला निमंत्रित करुन सह्या घेतल्या पण आमची भूमिका वेगळी आहे याचा खुलासा त्यांनी माझ्याकडे केला आहे असंही शरद पवार यांनी सांगितले.
याबाबतीत मी आत्ताच काही बोलणार नाही असंही शरद पवार यांनी स्पष्ट केले. मला जे सांगत आहेत त्यांनी जनतेसमोर हे मांडलं तर मी ते मान्य करेन अन्यथा त्यांनीही वेगळी भूमिका घेतली असं मी समजेन असा सूचक इशारा देत पक्ष आणि पक्षचिन्हावरून मी काही न्यायालयात जाणार नाही. उलट लोकांमध्ये जाऊन मी आमच्या पक्षाची भूमिका मांडेन असेही शरद पवार यांनी सांगितले.
तसेच पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, आजचा प्रकार हा इतरांना नवीन असेल. मला हा नवीन नाही. १९८० मध्ये निवडणुकी नंतर मी ज्या पक्षाचं नेतृत्व करत होतो त्याचे ५८ आमदार निवडून आले होते. एक महिन्यानंतर सहा सोडले तर बाकी सगळे सोडून गेले होते. सगळे पक्ष सोडून गेले, मी विरोधी पक्षनेता होता. त्यावेळी मी पाच लोकांचा नेता झालो. पाच लोकांना बरोबर घेऊन मी महाराष्ट्रात बाहेर पडलो. पुन्हा पक्षाची बांधणी केली. त्यानंतर जी निवडणूक झाली की त्यात आमची संख्या ६९ वर गेली ही दिसलं असंही सांगितलं. त्यावेळी जे पक्ष सोडून गेले त्यापैकी ४ जण सोडले तर बाकी सगळे पराभूत झाले. १९८० ला जे चित्र दिसलं तेच जनतेच्या पाठिंब्यावर कसं उभं करता येईल हे मी पाहतो आहे. माझा महाराष्ट्राच्या जनतेवर प्रचंड विश्वास आहे असंही सांगितले.