मुंबई : प्रतिनिधी
माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्याने गृहमंत्री पदाचा जबाबदारी आता कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला आहे. तर त्यांच्याकडील खाती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आले.
अनिल देशमुख यांचा राजीनामा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्विकारल्यानंतर तो लगेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. त्यामुळे या पदाची जबाबदारी सांयकाळी राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला. तर त्यांच्याकडील कामगार विभाग ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपविण्यात आले. तर अजित पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कारभार सोपविण्यात आला. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे हसन मुश्रीफ आणि अजित पवार यांच्याकडील विभागांमध्ये वाढ झाली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीला अनिल देशमुखही उपस्थित होते. देशमुख यांनी शरद पवार यांच्याकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर शरद पवार यांनी होकार दिला. त्यानंतर अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपविला.