समतेच्या वाटेने जाणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी नेहमी बंडाचा झेंडा हाती घेतला. त्यांनी लावलेले रयत शिक्षण संस्थेचे रोपटे आज वटवृक्ष झाला आहे. बहुजनांच्या मुलांना शिक्षण देणाऱ्या भाऊराव पाटील यांचा सन्मान करणे आमचे कर्तव्यच आहे असे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. आज निफाड तालुक्यातील विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ कला, विज्ञान विद्यालया मध्ये भाऊराव पाटील यांच्या जयंती सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जयदत्त होळकर, रयत शिक्षण संस्थेचे डॉ. सुजित गुंजाळ , सुवर्णाताई जगताप, जगदीश जेऊघाले,सरपंच सचिन दरेकर, कैलास सोनवणे, पंढरीनाथ दरेकर, आत्माराम दरेकर,सुरेखा नांगरे,मनीषा वाघ, अनिल दरेकर, किशोर, दरेकर, पांडुरंग राऊत, इस्माईल मोमीन, मोहसीन शेख, मुख्याध्यापक देवढे आदी उपस्थित होते .
यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, भाऊराव पाटील म्हणायचे की माझ्या दाढीला जेव्हढे केस आहेत तेव्हढे बहुजनांचे पोर शिकविल आणि या मनुवाद्यांच्या छाताडावर थया थया नाचतील. भाऊराव पाटील यांनी आयुष्यभर समतेचा झेंडा हाती घेतला आणि त्याच मार्गाने चालायला अनेकांना शिकवले. भाऊराव पाटील यांच्या पत्नीने फार मोठा त्याग केला. त्यांच्या पत्नीने शेवटचा शिल्लक असलेला दागिना म्हणजे मंगळसूत्र काढून दिले आणि सांगितले की या बहुजनांच्या पोरांना शिकवा. त्यामुळे ते आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई पाटील यांच्या त्यागावर आज ही रयत शिक्षण संस्थेची इमारत उभी आहे
भाऊराव पाटील यांनी नेहमीच या व्यवस्थेच्या विरुद्ध बंडाचे निशाण उभे केले. त्यांनी अस्पृश्यताविरुद्ध बंड केले, वर्णव्यवस्थे विरुद्ध बंड, अंधश्रद्धविरुद्ध बंड, पिळवणूक विरुद्ध बंड, सामाजिक आणि आर्थिक विषमता विरुद्ध बंड त्यांनी केले
यावेळी बोलताना ते म्हणाले की,काही ठिकाणी मुलांची गैरसोय होत असल्याचे माझ्या कानावर आले आहे. मात्र कुठल्याही परिस्थिती मध्ये मूला मुलींची गैरसोय आम्ही होऊ देणारं नाही या शाळकरी मुले आणि मुली यांच्यासाठी सर्व स्तरातून आम्ही मदत देऊ. त्याचबरोबर शिक्षण संस्थांच्या अडचणी आहेत त्या देखील आम्ही सोडविण्याचा प्रयत्न करू.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष डॉ. विश्राम घोले यांच्या मुलीने शिक्षण घेऊ नये म्हणून तिला काचा कुटलेला लाडू खायला दिला. स्री शिक्षणासाठी पहिला बळी हा त्या विश्राम घोले यांच्या मुलीचा गेला .तरी ज्यांनी शिक्षणाची कवाड आपल्याला खुली करून दिली अश्या शाहू – फुले – आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील, सयाजीराव गायकवाड यांची पूजा आपण केली पाहिजे असे ते म्हणाले.