मुंबई : प्रतिनिधी
वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणाची चौकशी करण्यात येईल. चौकशीअंती दोषी आढळलेल्या संबंधितांवर नियमान्वये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत दिली.
मागील अनेक महिन्यापासून अन्वय नाईक याच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्या पत्नीने रिपब्लिक टिव्ही चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी हे कारणीभूत असल्याचा आरोप करत रिपब्लिक वृत्त वाहिनीसाठी स्टुडिओ तयार करून घेतला. मात्र त्याचे १ कोटी रूपयांचे बिल दिले नाही. त्यामुळे अन्वय नाईक यांनी स्वत: गळफास लावून आत्महत्या केली होती. यासंदर्भात नाईक यांच्या पत्नीने अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात पोलिसांमध्ये गुन्हाही दाखल केला.
सदर घटनेच्या अनुषंगाने आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत अन्वय नाईक यांच्या आत्महत्ये प्रकरणासंदर्भात कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन दिले. त्यांच्या निवेदनास उत्तर देताना गृहमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी सदस्य सुनिल प्रभू, ऊर्जामंत्री डॉ.नितिन राऊत यांनीही गुन्हेगारास तत्काळ अटक करण्याची मागणी केली.