राज्यातील मराठा समाजाला कुणबी असल्याचे सरसकट जातीचे दाखले द्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवरून आणि ओबीसी आरक्षण प्रश्नी राज्य सरकारच्या संदिग्ध भूमिकेवरून काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधत म्हणाले, मराठा आंदोलकांवर गोळीबार झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे हिरो झाले. आणि ते आता सरकारलाच मराठा आरक्षणावरून धमकावत असल्याचा आरोप केला.
मनोज जरांगे पाटील यांनीही विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले, हिरोसारखे फालतू शब्द बोलायचे आणि लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा. ते त्यांची उभी हयात मराठा समाजात संभ्रम निर्माण करू शकणार नाहीत. ते तर सोडा, त्यांची पुढची पिढीही आता मराठ्यांमध्ये संभ्रम निर्माण करू शकणार नाही. कारण मराठा समाज त्या ५-६ जणांना पूर्णपणे ओळखून चुकला आहे अशा शब्दात प्रत्युत्तर दिले.
तसेच पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्ही हिरो झालो नाही. आम्ही स्वतःला हिरो मानतही नाही. म्हणूनच मराठ्यांनी आम्हाला स्वीकारलं. त्यांनी त्यांचे शब्द आठवावेत. सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील लोकांनी आम्हाला मोडायचं ठरवलं होतं. विरोधी पक्ष आमच्या बाजूने आवाज उठवत नव्हता. आमच्या आयाबहिणींची डोकी फोडली. त्यामुळे आम्ही हिरो झालो नव्हतो, तर आमचं आंदोलन संपवलं होतं. त्या दोघा-तिघांना आमचं आंदोलन संपवायचं होतं असा आरोपही राज्य सरकारवर केला.
विजय वडेट्टीवार नेमके काय म्हणाले….
विजय वडेट्टीवार म्हणाले, गोळीबारानंतर मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे हिरो म्हणून पुढे आले. त्यानंतर त्यांना समाजाचं सगळं पाठबळ मिळालं आणि ‘हम झुका सकते हैं’ असा गर्व झाला. त्यामुळे ते सरकारला धमक्या देतात. इतक्या तारखेपर्यंत करा, तितक्या तारखेपर्यंत करा, नाही केलं तर बघून घेऊ. कसे रस्त्यावर फिरतात ते बघू, अशा आम्हाला धमक्या देतात असा आरोप केला.
तसेच विजय वडेट्टीवार म्हणाले, खुल्या प्रवर्गात फार जाती शिल्लक राहणार नाहीत. म्हणजे नोकऱ्यांचा किंवा सवलतीचा जिथं संदर्भ येतो तेथे मराठा तरुणांचं फार मोठं नुकसान होणार आहे. अशास्थितीत मराठा तरूणांनी अभ्यास करून हित काय याचा विचार करावा असे आवाहनही केले.
तसेच पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, या प्रश्नावर मी मराठा नेत्यांच्या भूमिकेवर बोलण्याची गरज नाही. त्यांनी मराठा तरुणांना कशात हीत आहे, काय चांगलं आहे याबाबतची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही केली.