राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपा नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेली अवमानकारक वक्तव्ये, महाराष्ट्रातून अन्य राज्यात पळविले जाणारे प्रकल्प यांसह अनेक मुद्दय़ांवर महाविकास आघाडीतर्फे उद्या मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलिसांनीही या मोर्चासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान या मोर्चावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बच्चू कडू म्हणाले, कोणी जाणुनबुजून महापुरुषांचा अपमान करणारी विधाने करत असल्यास रट्टा दिला पाहिजे. तसेच राज्यपालांची बदली म्हणजे ते आता घरीच जातील.
महाविकास आघाडीच्या मोर्चासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, महापुरुषांबद्दल महाविकास आघाडीला प्रेम आहे ही चांगली गोष्ट आहे. राज्यपाल, चंद्रकांत पाटील किंवा संजय राऊत कोणीही असं विधान करायला नको होतं. पण शब्द चुकणं आणि जाणुनबुजून बोलणं हा मोठा फरक आहे.
महापुरुषांबद्दल कोणी जाणुनबुजून अपमानजनक बोलत असेल तर तो कोणत्याही पक्षाचा किंवा कोणत्याही पदावर असला तरी त्याला रट्टा दिला पाहिजे. पण कोणीही महापुरुषांबद्दल भांडवल करून राजकारण करु नये, असंही यावेळी त्यांनी नमूद केले.
कधीतरी आमच्याही तोंडातून चुकीचं वाक्य बाहेर पडतं. पण त्यानंतर लगेचच क्षमा मागत सामोरं गेलं पाहिजे. राज्यपालांनीही ते करण्यास हरकत नसावी, असा सल्लाही देत राज्यपालांची बदली म्हणजे ते आता घरीच जातील असं ते मिश्कीलपणे म्हणाले.
राज्यपालांनी देखील अशी विधानं करु नयेत. याआधी त्यांनी सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्याबद्दलही असं विधान केलं होतं. मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने असं बोलणं उचित नाही. जाणुनबुजून कोणी बोलत असेल तर योग्य नाही. हा लोकांच्या आस्थेचा विषय असल्याचेही त्यांनी सांगितले.