मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे युवराज तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा नियोजित १० जूनचा दौरा पुढे ढकलण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा दौरा नेमका कधी होणार याबाबत चर्चा सुरु झाल्यानंतर आदित्य यांचा नियोजित अयोध्या दौरा हा १० जून ऐवजी १५ जूनला होणार असल्याची घोषणा शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आज केली.
वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते.
मागील काही दिवसांपासून राज्यात राजकिय वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न केले जात आहे. मात्र कोणीही कितीही केले तरी राज्यातील वातावरण अस्थिर होणार नाही. राज्यात विकासाची कामे सुरु आहेत, रोजगाराचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र विरोधकांना ही चांगली कामे होवू द्यायची नसल्याने सातत्याने वेगवेगळे विषय उपस्थित करण्यात येत आहे. मात्र या गोष्टींना शिवसेना पुरून उरेल असे सांगत जर शिवसेनेच्या अंगावर याल तर त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
शिवसेनेच्या सभेत मंत्री आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाषण केले. यावेळी आदित्य ठाकरे बोलताना म्हणाले की, राज्यात विकासाची कामे सुरु आहेत. परंतु या कामावरून लक्ष हटविण्यासाठी विरोधकांकडून सातत्याने राज्य सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र अशा गोष्टींमुळे शिवसेना मागे हटणार नाही तर त्यांच्यावर मात करून राज्याला विकासाच्या वाटेवर नेणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांना शिवसेनेची तोफ अशी उपाधी देत त्यांचे भाषण ऐकायचेय असे सांगत आपले भाषण आवरते घेतले.
तत्पूर्वी राज्यात सत्तास्थानी आल्यानंतर आधी जाहिर केल्याप्रमाणे राज्यातील ३२ लाख शेतकऱ्यांची २ लाख रूपयांपर्यतचे कर्ज माफ करत शेतकऱ्यांना दिलासा दिला. याशिवाय राज्यात विकासकामे करताना पर्यावरणाचे संतुलन राखले जात आहे. तसेच विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास होवू देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.