Breaking News

नातू मुख्यमंत्री ठाकरेंच्या नजरेतून आजोबा प्रबोधनकार ठाकरे ‘प्रबोधन’ मधील प्रबोधनकार या त्रिखंडात्मक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई: प्रतिनिधी

शंभर वर्षापूर्वी चुकीच्या रुढी परंपरा तोडण्यासाठी केलेल्या चळवळीच्या इतिहासातून आजच्या पिढीला शिकता यावे यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांचे ग्रंथ साहित्य आजही समर्पक आणि मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारसाहित्याच्या त्रिखंडात्मक ग्रंथाचे उद्घाटन माझ्या हाताने होत आहे, हे मी माझे भाग्य समजतो. माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री हा बहुमान आणि प्रबोधनकरांचा नातू असणे हे भाग्य आहे, असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काढले.

प्रबोधन नियतकालिकेतील केशव सिताराम ठाकरे यांचे लेख असलेले ‘प्रबोधन’ मधील प्रबोधनकार या त्रिखंडात्मक ग्रंथांचे प्रकाशन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे झाले.  त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई, मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत, महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मंगलप्रभात लोढा, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, विश्वकोष मंडळाचे अध्यक्ष श्रीधर तथा राजा दिक्षित व इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रबोधनच्या शताब्दी निमित्त प्रसिद्ध झालेल्या या त्रिखंडात्मक ग्रंथाचे संपादक ज्येष्ठ पत्रकार सचिन परब, डॉ. रणधीर शिंदे, ज्ञानेश महाराव, सुनिल कर्णिक व विश्वंभर चौधरी यांना सन्मानित करण्यात आले. तसेच स्व.बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या balasahebthakaray.in या संकेतस्थळाचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

आपल्या नातवांचे लाड करणारे आजोबा प्रबोधनकार यांच्याविषयी आठवणी जागवतांना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, प्रबोधनकार कडक शिस्तीचे होते ते आम्हाला बाळासाहेब सांगायचे. आमच्या लहानपणी आजोबांनी राजा राणीच्या गोष्टी सांगितल्या नाही तर त्यांच्या विचारांच्या गोष्टी सांगितल्या.  प्रबोधनकार यांचे विचार जगातील सर्व कानाकोपऱ्यामध्ये पोहचले पाहिजे त्यासाठी त्यांच्या ग्रंथांचे भाषांतर झाले पाहिजे. शंभर वर्ष झाल्यानंतर माझ्या हस्ते या ग्रंथांचे प्रकाशन होत आहे हे माझ्यासाठी समाधान देणारे आहे. हीच भावना बाळासाहेबांवरील ‘फटकारे’ पुस्तकाचे प्रकाशन केले त्यावेळी होती.

नेता म्हणून लोकशाहीत मत महत्वाचे आहे पण लोकांमध्ये काम करीत असतांना हिंमत सुद्धा आवश्यक आहे. प्रबोधनकारांनी ती दाखवली. पूर्वीच्या काळातल्या वाईट चालिरीतींच्या विरोधात प्रबोधनकार ठामपणे उभे राहिले. ते नास्तिक नव्हते मात्र धर्माच्या नावावरील ढोंग त्यांना आवडत नव्हते. देश हाच धर्म अशी शिकवण त्यांनी दिली, परंतू स्वत:च्या धर्माविषयी वाईट विचाराने समोरुन कोणी आला तर मी एक कडवट हिंदू आहे हे लक्षात घ्यावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रबोधनकार घराघरात पोहचावेत – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

‘प्रबोधन’ या नियतकालिकाने संपूर्ण महाराष्ट्रात समाजसुधारणेचे नवे वारे निर्माण केले व महाराष्ट्राला वैचारिक समृद्धी दिली. तसेच नव्या विचाराची पिढी घडवण्यात प्रबोधन या नियतकालिकाने मोलाचा वाटा उचलला होता, त्यांचे विचार घरा घरात पोहचावेत यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यत ग्रंथ पोहचवावेत अशी सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

सर्व विद्यालयातील ग्रंथालयात ही ज्ञानसंपदा पोहचविणे आवश्यक आहे. प्रबोधनकारांच्या नावाने संमेलन व्हावे तसेच अभ्यासक्रमातूनही त्यांचे विचार शिकविले जावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या ग्रंथाचे स्वागत होईल – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

प्रबोधन या नियतकालिकाने बुद्धीप्रामाण्य व्यक्तिस्वातंत्र्य, सामाजिक समता, ऐहिक जीवनसमृद्धी आणि ज्ञाननिष्ठा या मूल्यांचा पुरस्कार केला. महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळ आणि त्यातील प्रबोधन परंपरा प्रबोधनाच्या उल्लेखाशिवाय अपूर्णच राहील. पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण करण्यात प्रबोधन या नियतकालिकेचा मोलाचा वाटा आहे. या ग्रंथांचे सर्वत्र स्वागत होईल असा विश्वास मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

प्रबोधनकार हे कृतीला विचारांची जोड देणारे समाज सुधारक होते. त्यांचे विचार नवीन पिढीपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी मराठी भाषा विभागाने साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून पेलली आहे. ही ग्रंथसंपदा लोकांपर्यंत पोहचविण्याचे मोलाचे कार्य करणारे संपादक मंडळ यांचे त्यांनी विशेष आभार मानले. या कार्यक्रमाच्या शेवटी मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव डॉ. भूषण गगराणी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

पार्श्वभूमी

महाराष्ट्राच्या वैचारिक चळवळीचा पुरोगामी परंपरेचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी सुरु केलेल्या प्रबोधन या नियतकालिकाचे दिनांक १६ ऑक्टोबर, २०२० ते दिनांक १५ ऑक्टोबर, २०२१ हे शताब्दी वर्ष महाराष्ट्र शासनाच्यावतीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरे करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने प्रबोधन नियतकालिकातील केशव सीताराम ठाकरे यांचे लेख ‘प्रबोधन’ मधील प्रबोधनकार, हा त्रिखंडात्मक संपादित ग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे.

या ग्रंथाचे संपादन सचिन परब, डॉ. रणधीर शिंदे, ज्ञानेश महाराव, सुनिल कर्णिक व विश्वंभर चौधरी यांनी केले आहे. प्रबोधन’ मधील प्रबोधनकार या ग्रंथाच्या तीन खंडांत ऑक्टोबर १९२१ से मार्च १९३० या कालावधीमध्ये प्रकाशित झालेले ‘प्रबोधन’ या नियतकालिकाचे ९१ अंकांमधील संपादित २४८ लेख अंतर्भूत करण्यात आले आहेत.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *