राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य करत आधीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाच्या आमदारांनी राळ उठवून दिली. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकिय वातावरण आधीच तापलेले आहे. त्यातच आता काल भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फुले-आंबेडकरांनी आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारणीसाठी भीका मागितल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यावरून सर्वचस्तरातून टीका होत आहे. यापार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी खोचक शब्दात चंद्रकांत पाटील यांच्यावर केली.
बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले किंवा भाऊराव पाटील असतील यांनी लोकांकडून पैसे घेऊन आपल्या संस्था उभ्या केल्या, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. मात्र, त्यांनी हेडगेवार किंवा गोळवलकरांचे नाव घेतलं नाही. याचा अर्थ हेडगेवार आणि गोळवलकरांनी त्यांच्या संस्था उभारण्यासाठी लोकांकडून पैसे घेतले नाहीत, तर आजच्या भाषेत खोक्यांच्या स्वरुपात पैसे घेतले आणि स्वत:च्या संस्था उभ्या केल्यात. ही कबुली चंद्रकांत पाटील यांनी दिल्यामुळे त्यांचं आम्ही जाहीर अभिनंदन करतो, असा उपरोधिक टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.
दरम्यान, पैठणमधल्या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांना शाळांना देण्यात येणाऱ्या अनुदानाबाबत बोलताना फुले-आंबेडकरांनी शाळेसाठी भीक मागितली होती, असं विधान केलं होतं. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडरकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरु केल्या. त्यांनी शाळा सुरु करताना सरकारने अनुदान दिलं नाही. तर, त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोकं होती. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत.