पैठण येथील कार्यक्रमात भाजपाचे नेते तथा उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटील यांच्यावर सर्वचस्तरातून टीकेचा भडीमार होत आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून एका अज्ञात व्यक्तीने आज चिंचवड गावात चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली. या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, माझ्यावर झालेली शाईफेक हा भ्याडपणा असून हिंमत असेल तर समोर या, असे आव्हान दिले.
मी चळवळीतला माणूस आहे. मी कोणाला घाबरत नाही. अशा प्रकारे पराचा कावळा करणं, योग्य नाही. मी केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. मी त्यावर तीनवेळा स्पष्टीकरणही दिलं आहे. तरीही अशाप्रकारे भ्याडपणे माझ्यावर शाईफेक करण्यात आली आहे. मी माझं पोलीस संरक्षण काढून कार्यक्रमाला जायला तयार आहे, हिंमत असेल तर समोर या असे आव्हानही त्यांनी महाविकास आघाडीला दिले.
अशा गोष्टींमुळे आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना तडा देतो आहे. सर्वांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, हे तत्व त्यांनी आयुष्यभर पाळले. मात्र, आता महाराष्ट्रात झुंडशाही सुरू आहे. ही झुंडशाही महाराष्ट्र शासन सहन करणार नाही. या घटनेचाही आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, उद्धव ठाकरे आणि सुषमा अंधारे यांनी आता या घटनेचाही निषेध करावा, असं मी त्यांना आवाहन करतो असेही ते म्हणाले.
आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सुट दिली तर काय होईल? पण ही आमचा संस्कृती नाही. शब्दाला शब्दानेही उत्तरं देता येतात. माझ्या विधानानंतर मी लगेच स्पष्टीकरण दिले होते. मुळात एका गिरणी कामगाराचा मुलगा या पदापर्यंत पोहोचणे, हे सरंजामशाही वृत्तीच्या लोकांना झेपत नाही. त्यामुळे असे भ्याड हल्ले सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले. पैठणमधील कार्यक्रमात मी बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची स्तृतीसुद्धा केली होती. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरु केल्या. मात्र, शाळा सुरू करताना ते सरकारी अनुदानावर अवलंबून राहिले नाहीत, असे मी म्हणालो होतो, फक्त मी ‘लोकसहभागातून’ हा शब्द वापरायला हवा होता. मात्र, आम्ही ग्रामीण भागातील लोकं आहोत. त्यामुळे आम्ही ग्रामीण भाषेत बोलतो. हेच या सरंजामशाही वृत्तीच्या लोकांना सहन होत नाही”, असेही ते म्हणाले. तसेच या घटनेबाबत चौकशी करताना कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला दोषी न ठरवता, त्यांच्यावर कारवाई होऊ नये, असेही आवाहनही त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी केले.