मुंबईतील विकास कामांच्या शुमारंभावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना तीन वर्षे निर्णय न घेता स्थगिती देण्यातच वाया गेल्याची टीका केली. तसेच आम्हाला दोनच वर्षे मिळाल्याने आम्हाला टेन्विटी टेन्विटी खेळावी लागत असल्याचे सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर देत उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या त्या वक्तव्यावरून टीकेची झोड उठविली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्हाला या सरकारच्या काळात फार तर परिणामकारक दोन वर्षे मिळणार आहेत. तीन वर्षे निर्णय न घेणं, निर्णय थांबवणं, स्थगिती देणं यातच जवळपास वाया गेलीत. त्यामुळे आता ट्वेंटी-२० ची मॅच खेळल्याशिवाय पर्याय नाही. केवळ ट्वेंटी-२० चा सामना खेळावा लागणार नाही, तर त्यात शतकही झळकावं लागेल. हे लक्षात आल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या कायापालटाची ही संकल्पना मांडली.
अजित पवार म्हणाले, आयला ते कर्नाटकवाले सारखे शिव्या घालत आहेत, आपल्या गाड्या फोडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले मी बैठक घेतो, तर बोम्मई म्हणाले की, मी बैठकीलाच येणार नाही. तसेच एक इंचही जागा सोडणार नाही. अरे चर्चेतून मार्ग निघतो ना.
आम्ही मागच्यावेळी सरकारमध्ये असताना मी अर्थसंकल्पात जे जाहीर केलं होतं त्यालाही शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली. त्यामुळे काही गावांच्या कामांचा निधी थांबला. अरे कुणाच्या बापाच्या घरच्या निधी आहे का? हा सरकारचा निधी आहे, असेही अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही चंद्रकांत पाटलांवर टीकास्र सोडलं. अजित पवार म्हणाले, फुले-आंबेडकरांनी अनुदानासाठी सरकारवर अवलंबून न राहता, त्यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या, असं विधान आपले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. वाह रे पठ्ठ्या… आपण रक्कम दिली तर त्याला देणगी दिली, असं म्हणतो किंवा लोकवर्गणी दिली म्हणतो. त्या काळात भाऊराव पाटील यांनी ‘कमवा आणि शिका’ योजना सुरू केली होती. जुन्या लोकांना हे आठवत असेल. प्रत्येकानं शिक्षण घेतलं पाहिजे, हा भाऊराव पाटील यांचा विचार होता.
त्या काळात काही लोकांनी कर्मवीरांना शाळेसाठी जमिनी दिल्या. तर काही लोकांनी खोल्या बांधून दिल्या होत्या. याचा अर्थ त्यांनी भीक मागितली का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागितली का? कुठले शब्द कसे वापरायचे? यांचं भान राखलं पाहिजे. अरे तुम्ही पुण्यासारख्या ‘विद्येचं माहेरघर’ असलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.