आरएसएस आणि भाजपा संत्तेत आल्यापासून देशात मुस्लिम दलित आदीवासी विरोधी धार्मिक ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. सध्या मणिपुर मध्ये सुरू असलेला हिंसाचार २००२ मध्ये झालेल्या गुजरात हिंसाचाराचे मॉडेल आहे.गुजरातमध्ये मुस्लिम विरोध होता तर मणिपुरमध्ये मैतेईचा वापर होत आहे.असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.
प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपा आणि आरएसएसवर जोरदार टीका केली. प्रकाश आंबेडकर म्हणाले की,अच्छे दिनच्या नावाखाली भाजपने कायम धार्मिक ध्रुवीकरण आणि ब्राह्मणवादाला खतपाणी घालण्याचे काम केले आहे, ज्यामुळे अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्यांक समूहाच्या विरोधात द्वेषातून केले जाणारे गुन्हे वाढले आहेत.ईशान्य भारतामध्येही असा प्रकार सुरू आहे. त्याठिकाणी सुद्धा ब्राह्मणवाद मोठ्या प्रमाणात रूजविण्याचे प्रकार चालू असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. या प्रकाराला वेळीच आवर घातला नाही तर भयावह परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा ही दिला.
भाजपाने जातीय संहाराचे २००२ चे गुजरात नरसंहार मॉडेल राबविल्यानंतर भाजपा-आरएसएसला केंद्रात सत्तेत बसवले त्यांनी तेच गुजरात मॉडेल ईशान्य भारतात आयात केले आहे अशी टीका करून अॅड आंबेडकर म्हणाले,की
मणिपूर मध्ये सुरू असलेला हिंसाचार बघितला तर लक्षात येते की गुजरात मधील २००२ हिंसाचाराशी बरेच साधर्म्य आहे. राज्य प्रायोजित हिंसाचार करून संघर्ष जास्त काळ सुरू ठेवलेला नरसंहार, महिलांवर बीभत्स अत्याचार करून विटंबना केली जात आहे. यामध्ये द्वेष आणि जातीवादाची जी दुकानदारी आहे त्या व्यापाराचा जो सर्वात मोठा ठेकेदार दिल्लीत बसून स्वत:ला प्रधान सेवक म्हणवतो. त्यांना मी सांगू इच्छितो की गुजरात हिंसाचार घडल्यावर सोनिया गांधी यांनी तुम्हाला जे नाव दिले होते ते जाता जाता खरे करू नका असा टोलाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेता लगावला.
एक धर्मनिरपेक्ष संघराज्य म्हणून भारताच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. ते पुसून टाकले जाऊ नये या करीता सर्वांनी प्रयत्न केले पाहीजेत. मणिपुरचा हिंसाचार याला तेथील राज्य सरकार आणि केंद्र सरकार जबाबदार आहे जर वेळीच खबरदारी घेतली असता तर मणिपुरची परीस्थिती चिघळली नसती. जेव्हा अशी परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी होते त्यावेळी सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार घटनेनं दिलेला आहे असेही अॅड. आंबेडकर म्हणाले.
संभाजी भिडे प्रकरणी प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांना दोष
शरद पवार यांनी भिमा कोरेगावच्या संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पत्र लिहले होते. राज्यात सरकार त्यांचेच होते. मग पवार यांनी त्यांच्याकडील कागदपत्रे सरकारकडे का दाखल केली नाहीत. पुण्याच्या पोलिस अधिक्षकांनी जे प्रतिज्ञापत्र सुप्रिम कोर्टात दाखल केले होते. त्यात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या नावांचा उल्लेख होता. शासनाकडे आम्ही भिडेंवर कारवाई करण्याची मागणी करत होतो. पण शासन आमच्याकडे कागदपत्रे नाहीत म्हणून सांगत होते. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले परंतु भिडेंच्या संदर्भातील कागदपत्रे दाखल केली नाहीत. त्यावेळी जर पवार यांनी ती कागदपत्रे सरकारकडे दिली असती तर संभाजी भिंडेवर कारवाई होऊन त्यांची आजची वक्तव्य बाहेर आली नसती असे सांगून संभाजी भिडे वक्तव्याप्रकरणी शरद पवारांना दोष दिला.