मुंबई : प्रतिनिधी
कोविड – १९ प्रादुर्भावामुळे देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात केंद्र शासनाच्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्यांसाठी प्रती व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ व प्रती शिधापत्रिका १ किलो डाळ मोफत वाटप करण्यात येत आहे. मात्र अद्यापही देशात कोरोनाचा धोका कायम असल्याने अजून गोरगरीब नागरिकांच्या हाताला काम नसल्यामुळे या योजनेस जुलै ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय अन्न, पुरवठा मंत्री राम विलास पासवान यांच्याकडे केली.
यासंदर्भात छगन भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांना पत्र दिले आहे.
कोविड – १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन केल्याने नागरिकांच्या उपजिविकेवर मोठा परिणाम झाला. या परिस्थितीत केंद्र शासनाच्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत (पीएमजीकेवाय) राज्यातील पात्र लाभार्थ्यांना एप्रिल ते जून २०२० या कालावधीत प्रती व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ व प्रतीशिधापत्रिका १ किलो डाळ मोफत वाटप करण्यात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याची बाब त्यांनी केंद्राच्या निदर्शनास आणून दिली.
मात्र अद्यापही देशात कोविड १९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. केंद्र शासनाच्या वतीने जनजीवन सुरळीत करण्याच्या दृष्टीने अनलॉक प्रक्रिया जरी सुरु केलेली असली, तरी देशातील अर्थचक्राला गती येण्यासाठी अजून काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्यावतीने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सुरु असलेले मोफत धान्य वितरणास जुलै ते सप्टेंबर २०२० या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात येऊन राज्यातील गोरगरीब नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
Tags chhagan bhujbal covid-19 free food grain ramvilas paswan
Check Also
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा ‘शपथनामा’ जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्याला ‘शपथनामा’ असे नाव …