मुंबई: प्रतिनिधी
महाविकासआघाडी सरकारला कोरोनाची परिस्थिती नियंत्रणास आणण्यात सपशेल अपयश आले असुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची निष्क्रियताच याला कारणीभूत आहे. निर्णय घेण्यास मुख्यमंत्री सक्षम नसुन ते फक्त मातोश्री पुरतेच मर्यादित असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे खासदार नारायण राणे यांनी सोमवारी मुंबई येथे केली.
भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषेदपूर्वी खा. राणे यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. यावेळी भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, आमदार नितेश राणे आणि माजी आमदार राज पुरोहीत उपस्थित होते.
ते म्हणाले की, राज्यात कोरोना मुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यास त्यावर उपाययोजना शोधण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मविआ सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. करोनाच्या प्रश्नांवर मंत्र्यांच्या बैठका सुद्धा आयोजित केल्या जात नाहीत. मुख्यमंत्री हे मातोश्रीच्या बाहेर सुद्धा पडत नाहीत. त्यामुळे मंत्रालय हे मुख्यमंत्री सांभाळत नसुन अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांना जनतेच्या प्रश्नांची जाण नाही. ते जनतेचे प्रश्न सोडवू शकत नाहीत. प्रशासन हाताळण्यास आणि निर्णय घेण्यास ते सक्षम नाहीत.
राज्याला या चार महिन्यात १० वर्ष मागे घेऊन जाण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या काळात कोरोना योद्धे डॉक्टर, परिचारिका यांचे पगार दिले नसून बेस्ट कर्मचाऱ्यांनाही सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. एक महिना उलटून गेला तरी निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना आर्थिक मदत मिळालेली नाही. कोरोनाच्या कठिण काळात राजकारण करू नये असे आवाहन मविआ सरकारकडून करण्यात येते पण या संकटाचे निवारण करण्याची ताकद या सरकारमध्ये आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Tags bjp cm uddhav thackeray covid-19 keshav upaddhey matoshri banglow mp narayan rane raj purohit
Check Also
सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …