मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्यात विशेषतः मुंबई, पुणे आदी भागात करोना व्हायरसने प्रभावित रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आमदारांना आपापल्या मतदारसंघातील नागरीकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी तसेच या आजाराची लागण विधिमंडळाच्या सदस्यांना होवू नये याकरीता विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन येत्या शनिवारी संपविण्याचा निर्णय राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आल्याची माहिती सांसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी विधानसभेत दिली.
यासंदर्भात सांसदीय सल्लागार समितीमध्ये याविषयावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी उपस्थित असलेल्या सर्वच गटनेत्यांनी अधिवेशन असेच पुढे चालू ठेवण्याची तयारी दर्शविली. मात्र सदर आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून अधिवेशन अर्थसंकल्पिय मागण्यावर चर्चा आणि पुरवणी मागण्या मंजूर झाल्यानंतर लगेच संस्थगित करण्याचा प्रस्ताव आपण मांडल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. त्यावर इतर सदस्यांनीही त्यास होकार दिल्याने शनिवार पर्यंत या दोन्ही विषयांवर चर्चा होवून अधिवेशन संस्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.