Breaking News

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विदर्भात जलसंधारणाची मोठी कामे होणे गरजेचे

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील कन्याकुमारीपासून निघालेल्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला. महाराष्ट्र हा काँग्रेस विचारधारेला माननारे राज्य आहे. या पदयात्रेमुळे जनतेमध्ये भाजपाने निर्माण केलेली भीती, द्वेष व दहशतीला चोख उत्तर देण्याचे बळ मिळाले आहे. भारत जोडो यात्रेला प्रचंड जनसमर्थन तर मिळालेच पण शेगावमध्ये अभूतपूर्व अशी विराट सभा झाली व राज्यातील जनतेने राहुलजींवर प्रेम व विश्वास व्यक्त केला. या पदयात्रेमुळे निर्माण झालेले काँग्रेसमय वातावरण राज्यभर कायम ठेवू, असा निर्धार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

बुलढाणा जिल्ह्यातील जलंब येथील भारत जोडो यात्रेच्या कॅम्पमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, भारत जोड़ो यात्रा आता जनआंदोलन झाले आहे आणि ही यात्रा आता कोणीही रोखू शकत नाही. या पदयात्रेने देशात परिवर्तन अटळ असल्याचे स्पष्ट झाले असून खोटे बोलून सत्तेत आलेल्या व नंतर जनतेची घोर फसवणूक करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे सरकार जनताच खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. ही पदयात्रा विशाल होईल व जनतेचे मोठे समर्थन मिळेल असे मी दोन महिन्यापासून सांगत होतो तेव्हा विरोधक आमची खिल्ली उडवत होते. पण देगलूरपासून बुलढाणा जिल्ह्यापर्यंत मिळालेले जनसमर्थन राहुल गांधी व काँग्रेसवरचा विश्वास दृढ करणारे ठरले आहे. आता देशात परिवर्तन होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

यावेळी बोलताना जयराम रमेश म्हणाले की, भारत जोडो यात्रेला महाराष्टातून मोठा प्रतिसाद मिळाला. शेगावची सभा ही भारत जोडो यात्रेवर प्रेम व विश्वास दाखवणारी विशाल सभा झाली. सभेसाठीची २२ एकर जागा दुपारीच फुल्ल झाली होती. राहुल गांधी यांना ऐकण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने लोक या सभेसाठी आले होते. आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे, स्व. इंदिराजी गांधी यांची जयंती आहे, त्यानिमित्ताने पदयात्रेत महिलांचा सहभाग मोठा होता. बंजारा समाजाच्या ७ ते ८ हजार महिला दुपारच्या सत्रात पदयात्रेत सहभागी होऊन नारीशक्तीचे प्रदर्शन घडवतील.

दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आजच्या दिवशी मागील वर्षी मोदी सरकारला काळे कृषी कायदे रद्द करावे लागले. स्वतंत्र्य भारतात पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी एवढे मोठे आंदोलन केले. त्यात ७०० शेतकरी शहिद झाले, अखेर मोदी सरकारला झुकावे लागले व ते काळे कायदे रद्द करावे लागले. हा शेतकऱ्यांचा मोठा विजय असून या निमित्ताने ‘शेतकरी विजय दिवस’ पाळला पाहिजे. विदर्भातील शेतकरी आत्महत्या संदर्भात वारंवार विचारणी केली जाते की यावर उपाय काय? शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जलसंधारणाची कामे या भागात मोठ्या प्रमाणात झाली पाहिजेत. शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला तर विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखल्या जाऊ शकतात.
या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माध्यम विभागाच्या महिमा सिंह उपस्थित होत्या.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका भटकती आत्मा…शरद पवार म्हणाले, ते खरंय

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराबरोबरच, बारामती आणि शिरूर मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *