मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले असून, दोन्ही सभागृहाचे कामकाज आज लवकर संपले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत तिन्ही पक्षांच्या आमदारांनी दररोज सभागृहात हजर रहा असे आदेश दिले.
या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली असून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असेपर्यंत सभागृहात रोज सर्व आमदारांनी उपस्थित राहायला हवे असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बजावले.
तसेच सरकारला अडचण निर्माण होईल असे कुणीही वक्तव्य करू नये अशी तंबीच महाविकास आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची तिन्ही पक्षाच्या आमदारांना दिली.
हे सरकार पडणार नाही –
दरम्यान नुकताच भाजपा खासदार नारायण राणे यांनी हे सरकार अकरा दिवस टिकेल असे भाकित केले. त्यानंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर शंका उपस्थित केली जाऊ लागली. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना धीर देत हे सरकार पडणार नाही याची शाश्वती मी देतो असे आश्वासित करत तसेच कोणीही काही बोलले तरी आपले सरकार टिकणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान महाविकास आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधींचे ही कौतुक केले. सोनिया गांधी या चांगल्या विचारांचे आहेत असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील महा विकास आघाडीच्या बैठकीत सर्व आमदारांना विधानसभेत हजर रहा, चर्चेत सहभागी व्हा, आपले प्रश्न मांडा, जनतेचे प्रश्न सोडवा, लोकांना महाविकास आघाडीकडून हीच अपेक्षा असल्याचे सांगितले.