मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणात आतापर्यंत विद्यमान आमदार, खासदार किंवा कोणताही लोकप्रतिनिधीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्या लोकप्रतिनिधीने केलेल्या कामाची पावती अथवा त्याने केलेल्या कष्टाला पोहोच म्हणून त्या व्यक्तीच्या घरातील कोणाही एकाला राजकिय वारसदार म्हणून त्या राजकिय पक्षाकडून जाहीर केले जाते. परंतु भाजपने त्यांच्या पक्षाचे निष्पृह आणि स्वच्छ चारित्र्याच्या व साध्या राहणीमानातून पक्षवाढीसाठी झटणाऱ्या खासदार चिंतामण वणगा यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना वाऱ्यावर सोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात पक्ष मग तो कोणताही असो त्या पक्षाचा आमदार, खासदार, साधा नगरसेवक जरी वारला तरी त्या मृत लोकप्रतिनिधीचा मुलगा, मुलगी किंवा पत्नीला तिकिट देवून त्याने पक्षासाठी खालेल्या खस्ताची आठवण ठेवून त्या पक्षाकडून त्याचा उत्तराधिकारी म्हणून त्याला राजकारणात संधी दिली जाते. आतापर्यंत अगदी अलीकडील उदाहरण द्यायचे झाले तर मनसेचे पुणे येथील रमेश वांजळे यांचे निधन झाल्यावर त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याचा मनसेने निर्णय घेतला. मात्र त्यांच्या पत्नीने पक्षानंतर केले. तरीही मनसेकडून वाजंळे यांच्या पत्नीच्या विरोधात उमेदवार दिला नाही. तसेच वांद्रे येथील शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांचाही असाच मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला उमेदवारी देत त्यांना विधानसभेवर निवडूण आणले. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा लोकप्रिय आमदार आर.आर.पाटील यांच्या निधानानंतर तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांचे कुटुंबियातील अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली. ऐवढेच नव्हे तर आर.आर.पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांना विधानसभेवर निवडूण आणले त्यांच्या मुलीची सर्व जबाबदारी शरद पवारांनी अर्थात त्यांच्या राष्ट्रवादीने पूर्णपणे शिरावर घेत लग्नात येणाऱ्या पाहूण्यांपासून ते अक्षता वाटण्यापर्यंतची कामे अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पार पाडली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे देखील निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना त्यांचे वारसदार म्हणून काँग्रेस पक्षाकडून पुढे आणले जात आहे. वास्तविक पाहता एखाद्या लोकप्रतिनिधीच्या मृत्यूनंतर त्याच्या रिक्त झालेल्या ठिकाणी कोणाला तिकिट द्यावे याचा सर्वस्वी अधिकार त्या पक्षाच्या नेतृत्वाला आहे. परंतु ज्या काळात भाजपला मते देणारे मतदारही नव्हते. त्या काळापासून पक्षवाढीसाठी इमाने इतबारे काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या कुटुंबाला त्यांचा राजकिय वारसही ठरू द्यायचे नाही इथपर्यंत एकाद्या राजकिय पक्षाने कोडगेपणाने वागणे हे राज्यातील कदाचीत पहिलेच उदाहरण आहे.
या उलट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंतामण वनगा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याचे टाळले असून त्यांच्या कुटुंबियांना राजकारणातील संधीही नाकारली आहे. त्यामुळे राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असूनही आपल्याच पक्षाच्या जून्या निष्ठावान कार्यकर्त्याविषयी इतका कोडगेपणा भाजपने दाखवावा याबाबत राजकिय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे वणगा यांचा वारसदार एखादा पैसैवाला राजकीय व्यक्ती भाजपकडून निवडला जाणार असल्याची शक्यता भाजपच्या वर्तुळात बोलून दाखविण्यात येत आहे.
त्यामुळे अखेर खासदार चिंतामण वणगा यांचे दोन्ही चिरंजीव, त्यांच्या पत्नी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेत झाल्या प्रकाराबद्दल तक्रार केली. त्यावर उध्दव ठाकरे यांनी याबाबत अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी वणगा यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठाकरे कुटुंबिय पाठीशी उभे राहतील अशी शक्यता आहे. वणगा कुटुंबियांनीही होत असलेल्या प्रकाराबद्दल भाजपच्या विरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.