मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा काढणाऱ्यांना फायनान्स करणारे कोण ? तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पत्रकार परिषदांची बीले अदा करणारे कोण आहेत? याची माहिती सरकारकडे इंटेलिजन्स असल्याने सर्व माहिती मिळते असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगत केवळ सरकारच्या विरोधात मराठा समाजाला उचकाविण्यासाठी काहीजणांकडून जाणीवपूर्वक नवनव्या गोष्टी काढायला लावत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर त्यांनी केला.
मराठा समाजाने त्यांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी राज्य सरकारला १५ दिवसांचा अल्टीमेटम मराठा क्रांती मोर्चा संघर्ष समितीने दिला. त्यास उत्तर देण्यासाठी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार प्रामाणिक प्रयत्न करत आहे. तसेच मराठा समाजाबरोबर ज्या ज्या वेळी वेळी चर्चा करून प्रश्न निकाली काढण्यासाठी जो काही तोडगा निघाला त्याविषयीचे शासन निर्णय सरकारकडून जाहीर करण्यात आले. त्या निर्णयांची अमंलबजावणी अद्यापही सुरुच आहे. तरीही काही जणांकडून सरकार काही काम करत नसल्याचे दाखवून देण्यासाठी त्यांना उचकावित असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
याशिवाय अशा उचकाविणाऱ्यांची सर्व माहिती आम्हाला असून त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी सरकार प्रामाणिकपणे काम करत असल्याचा पुर्नच्चार केला. याशिवाय राज्य सरकार करत असलेल्या कामावर ९९ टक्के मराठा समाज समाधानी असल्याचे सांगत फक्त १ टक्का समाज अशा उचकाविणाऱ्यांमुळे नाराज असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
याशिवाय ओबीसी समाजाला ज्या ज्या शैक्षणिक कोर्सेसमध्ये फि सवलत दिली जाते. ते सर्व कोर्सेस मराठा समाजासाठीही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा प्रश्न सोडविण्यासाठी भाड्याने जागा घेवून तेथे वसतिगृह सुरु करावेत अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
गरीब विद्यार्थ्यांना १ लाखापर्यंत पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता १० महिन्याचे ३० हजार अनुदान देणार. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना २० हजार रूपये तर १ ते ८ लाख पर्यंत उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना १० हजार निर्वाह भत्ता देणार असल्याचे त्यांनी सांगितले.