मुंबई: प्रतिनिधी
शालेय विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने महापुरूषांबरोबर पंतप्रधान नरेद्र मोदी यांची पुस्तके खरेदी करून त्याचे विद्यार्थ्यांमध्ये वाटप करण्यात येणार आहेत. तसेच ज्या पुस्तकांचा उल्लेख काहीजणांनी केला ती सर्व पुस्तके दोन वर्षापूर्वीची असल्याचे सांगत आताची जी पुस्तके छापलेली आहेत. त्यात काहीही आक्षेपार्ह नसल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगत आज बुधवारी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
काल पुणे येथे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेत शिक्षण विभागाकडून खरेदी करण्यात येणाऱ्या पुस्तकांच्या अनुषंगाने आरोप केले. तसेच त्या अनुषंगाने काही पुरावेही उपस्थित केले. त्यावर खुलासा करण्यासाठी शिक्षण मंत्री तावडे यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात पत्रकार परिषद घेतली.
यावेळी विखे-पाटील यांच्यावर तावडे यांनी पलटवार करत दोन वर्षांपूर्वीची पुस्तके दाखवून विरोधी पक्षाने आपलीच नाचक्की करून घेतली. या पुस्तकांत काहीही आक्षेपार्ह मजकूर नसून तसा असल्यास किंवा निदर्शनास आल्यास अजून एका तज्ज्ञ समितीकडून या पुस्तकांची पाहणी करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
संत विखे पाटलांचं पुस्तक नाही!
‘भारतीय विचार साधना’ यांचे जे पुस्तक २० रूपयाला उपलब्ध आहे, तेच पुस्तक सरकारने चक्क ५० रूपयांत खरेदी केले असा आरोप विखे पाटील यांनी केला होता. यावर उत्तर देताना त्यांनी जे पुस्तक दाखवले ते छोटी प्रत होती, त्याच्या मुखपृष्ठाचा आणि पानांचा दर्जा ही इतका चांगला नव्हता. विभागाने विद्यार्थ्यांसाठी मागवलेल्या पुस्तकांचा दर्जा उत्तम असल्याने त्यांची किमत वाढल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. पुस्तक खरेदीत महापुरुषांच्या पुस्तकांपेक्षा मोदींची पुस्तके जास्त असल्याची ओरड सध्या सुरु आहे. ही ओरड खोटी असून इतर महापुरुषांची पुस्तके आणि पौराणिक कथांची पुस्तके यांचा समावेश असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. मात्र या पुस्तकांत संत विखे पाटलांचे पुस्तक नसल्याची बोचरी टीका त्यांनी केली.
शिक्षणमंत्र्यांचा राग अनावर
पुस्तकांतील आक्षेपार्ह मजकूर प्रकाशन संस्थेने बदलला असल्याचा दावा शिक्षणमंत्र्यांनी केला. मात्र बदललेला मजकूर जेव्हा त्यांना वाचून दाखवण्यात आला आणि त्यावर हा मजकूर विद्यार्थ्यांसाठी कितपत योग्य आहे असा सवाल केला तेव्हा शिक्षणमंत्र्यांचा राग अनावर झाला. तज्ज्ञ समितीने या पुस्तकांची निवड केली असल्याचे जरी शिक्षणमंत्री विनोद तावडे सांगत असले तरी त्यातील मजकूर पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच नाही हे स्पष्ट झाले आहे.