मुंबई : प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाची चांगली परिस्थिती होती. कुणीही आमच्या सागंली जिल्हयाच्या सीमेवर पलिकडे जो भाग आहे. तिथलं लोकं काही काँग्रेस पक्ष आणि तिथल्या सरकारवर निगेटिव्ह बोलत नव्हते. एकंदरीत वातावरण बघितलं तर काँग्रेसला चांगलं वातावरण होतं. त्यामुळे काँग्रेसचा विजय होईल असं वाटत होतं. बहुसंख्य ठिकाणी काँग्रेसला चांगला प्रतिसादही मिळत होता. मला आश्चर्य वाटतंय की, भाजपचा एकमार्गी विजय मिळणं हे मला पटत नाहीय. माझा विश्वास बसत नाहीय अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कर्नाटक निवडणूक निकालानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कर्नाटकमध्ये ग्राऊंड लेवलला माझा जास्त परिचय नाही परंतु मला जी माहिती मिळत होती. त्यावरुन काँग्रेसची परिस्थिती चांगली आहे आणि आजचे निकाल पाहिले तर एवढया मोठयाप्रमाणात भाजप निवडून येणं आणि कमी प्रमाणात काँग्रेस निवडून येणं हे मिळत असलेल्या फिडबॅकशी सुसंगत नव्हते. ग्राऊंड रिअलिटीमध्ये लोकांच्या मनात होतं तेच फिडबॅकमध्ये येतं परंतु मला वाटत नाही तिथल्या लोकांच्या मनात जे होतं. त्यात आणि मतं पडली त्यात सुसंगती आहे अशी शंकाही जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली
निवडणूक आयोगाने इथून पुढच्या सर्व निवडणूका बॅलेट पेपरवर घ्याव्यात
दरम्यान, शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही ईव्हीएमवर लोकांचा विश्वास नाही. ईव्हीएम मॅनेज केले जावू शकते हे या देशातील अनेक मोठे मान्यवर लोकं बोलत आहेत.त्यामुळे ईव्हीएमचा निवडणूक आयोगाने हा आग्रह सोडून दयावा आणि पुन्हा एकदा बॅलेटपेपरचा वापर करावा. पेपर मोजायला वेळ लागेल. लोकांच्या मनातील शंका घालवण्यासाठी निवडणूक आयोगाने इथून पुढच्या सर्व निवडणूका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. कर्नाटक राज्याचा आज निकाल जाहीर झाल्यावर मिडियाशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.
कर्नाटकमधील येडुरप्पांची प्रतिमा बघितली, त्यांच्यावर झालेले वेगवेगळया भ्रष्टाचाराचे झालेले आरोप बघितले किंवा भाजपचे त्या राज्यातील अस्तित्व पाहिलं तर मर्यादित होतं त्यामुळे आता त्याचं विश्लेषण केलं पाहिजे की,जनता दलामुळे सेक्युलर मतं जी आहेत त्याचा फायदा भाजपला झाला का? किंवा भाजप ज्याठिकाणी कधीही आलं नाही त्या ठिकाणी भाजप येण्याची काय कारणं आहेत. जर जनाधार नसेल आणि तरी तिथे भाजपला बुथवर जास्त मतं मिळाली तर राज ठाकरे यांच्या मतानुसार ईव्हीएमबद्दल शंका घेण्यासारखं आहे. राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया मिडियाला दिली.