मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा प्रयत्न केला असता ती दाखल करून घ्यावी की नाही याविषयी बाजू मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांना कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे नोटीस बजावली. या घटनेचे भांडवल करून राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणे ही त्या पक्षाची बौद्धिक दिवाळखोरी असल्याचा टोला भाजपाचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी लगावला.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात त्यांच्यावर दाखल असलेल्या सर्व प्रकरणांची माहिती स्पष्टपणे देण्यात आली होती. या संदर्भात यापूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका उच्च न्यायालयाने तथ्यहीन मानून फेटाळली होती. संबंधित याचिकाकर्त्यांविरुद्ध उच्च न्यायालयाने अवमानाची कारवाई सुद्धा सुरू केली. सतत खोडसाळ याचिका दाखल करीत असल्याबद्दल कारवाई का करू नये, असेही विचारले होते. या पार्श्वभूमीवर आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेली नोटीस ही याचिका दाखल करून घ्यायची की नाही, यासंदर्भातील आहे. तेथे त्यावर योग्य ते उत्तर सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेली नोटीस ही केवळ तांत्रिक स्वरुपाची व प्रक्रियेचा भाग असून याचिकेचा हा अत्यंत प्राथमिक टप्पा आहे. तरीही त्यावरून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणे म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी असल्याची टीका त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली.