मुंबई : प्रतिनिधी
निवडणूकीच्या कालावधीत दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये स्वत:बद्दलची सर्व माहिती दिलेली आहे. तरीही अँड.सतीश उके यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने सदरची याचिका न्यायालयात दाखल करून घ्यायची की नाही याबाबत विचारणा करणारी नोटीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविली असल्याचा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाने केला.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केले होते, त्यात त्यांच्यावर दाखल सर्व प्रकरणांची माहिती स्पष्टपणे देण्यात आली होती. या संदर्भात याच याचिकाकर्त्यांनी यापूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि ती उच्च न्यायालयाने तथ्यहीन मानून फेटाळली होती. याच याचिकाकर्त्यांविरुद्ध उच्च न्यायालयाने न्यायालय अवमाननेची कारवाई सुद्धा प्रारंभ केली आणि सतत खोडसाळ याचिका दाखल करीत असल्याबद्दल कारवाई का करू नये, असेही विचारले होते.
आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेली नोटीस ही याचिका दाखल करून घ्यायची की नाही यासंदर्भातील आहे. त्या नोटीशीला सर्वोच्च न्यायालयात योग्य ते उत्तर सादर केले जाणार असल्याचा मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले.