मुंबई : प्रतिनिधी
कोरेगांव भिमा येथे झालेली दंगल रोखण्यात गृह खात्याने अक्षम्य बेफिकिरपणा दाखविला आहे. ही घटना घडल्यानंतर राज्य सरकारकडून या भागातील इंटरनेट सेवा बंद करायला हवी होती. मात्र मराठा आणि दलित समाजात दंगल निर्माण करण्यासाठीच राज्य सरकारने ही दंगल पुरस्कृत केल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. या दंगल प्रकरणी राज्याचे विशेष पोलिस महासंचालक, पुणेचे विशेष पोलिस महानिरिक्षक, पुणेचे पोलिस आयुक्त आणि पुणे ग्रामीणचे अधिक्षकांना तात्काळ निलंबित करावे आणि नैतिकता स्विकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
मंत्रालयासमोरील शासकिय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कमला मिल येथील मोजो-ब्रिस्टो व वन अबव रेस्टॉरंटला लागलेल्या आगप्रकरणात मुंबई महापालिकेकडून फक्त कारवाईचा देखावा करण्यात येत असून ही लोकांच्या डोळ्यात धूळफेकीचा फार्स सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
या आगप्रकरणाच्या चौकशीला आक्षेप असून चोराच्याच हाती तिजोरीच्या चाव्या देण्यात आल्याचे दिसून येत असून याप्रकरणी ३०२ चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत मुंबई पोलिस आयुक्तांचे मोबाईल फोन जप्त करून कॉल रेकॉर्ड तपासा कुणी फोन केले याची माहिती पुढे आली पाहिजे. तसेच अशा भ्रष्ट आयुक्तांना तात्काळ निलंबित करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला असून या भ्रष्टाचारात शिवसेनचे आणि भाजप नेते गुंतलेले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मुंबईत कामगार कायदे पाळले जात नाहीत. सरकारला सामान्य माणसाच्या आयुष्याची किंमतच नाही. त्यामुळे भानू फरसाण आगप्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. तर कमला मिल आगप्रकरणी लगेच कारवाई करत अधिकारी निलंबित केले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी करत मुंबईतील ८५ स्टुडिओ बेकायदा असून त्याचे फायर ऑडिट केलेले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच कमला मिल आगप्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करावी यासाठी उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचे विखे-पाटील यांनी शेवटी जाहीर केले.