कोरोना काळानंतर देशातील सरकार मालकीचे उद्योग विकायला काढण्यात आले असून अनेक उद्योगांची विक्री करण्यात आली आहे. तसेच स्वातंत्र्यानंतर देशावरील कर्जाच्या रकमेतही मोंदीच्या काळात झाली आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा पंतप्रधान कार्यालयाचे माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर टीका करत म्हणाले की, मोदी सरकारने सर्वाधिक कर्ज करून ठेवले आहे. मात्र त्यांच्याकडे व्यवस्था चालवायला, पगाराला आणि कर्जाचे हप्ते आणि पगार द्यायला सरकारकडे पैसे नाहीत. त्यामुळे मंगळसूत्र विकून देश चालविण्याची वेळ मोदींवर आली असल्याची टीका केली.
पृथ्वीराज चव्हाण हे कराडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर टीका करत देशाच्या आर्थिक स्थितीवर भाष्य केले.
चीनच्या सैनिकांचे हल्ले होतच असून, भारताचा भूभागही त्यांनी बळकावला आहे. मात्र, संसदेत त्यावर नरेंद्र मोदी सरकार चर्चाच करीत नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने इंधन करातून तब्बल २८ लाख कोटी रुपये गोळा केले. अन्य करवाढीचा बोजाही वाढतच असताना देशाची आर्थिकदृष्ट्या मात्र, प्रचंड अधोगती सुरु आहे. मोदी सरकारने इतिहासातील सर्वाधिक कर्ज करून ठेवले आहे. मात्र, तरीही त्यांच्याकडे व्यवस्था चालवायला, पगाराला आणि कर्जाचे हप्ते द्यायलाही पैसे नसल्याने सरकारी कंपन्या, बंदरे विकून खर्च भागवला जात आहे. मंगळसूत्र विकून देश चालवण्याची नामुष्की पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आली आहे. रस्ते, प्रकल्पांवर प्रचंड खर्च होत असताना, या सरकारचे शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचीही टीका केली.
भारताची जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असल्याचे नरेंद्र मोदी सांगत असले तरी भारतीयांचे दरडोई उत्पन्न तळाशी आहे. गरिबी, बेकारी, कुपोषण झपाट्याने वाढत असताना गौतम अदानीसारखा एक उद्योगपती भारतातील सर्वात श्रीमंत आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत मात्र, कसा होतो असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अत्याचाराचा प्रश्न राज्य सरकारने सोडवणे गरजेचे असताना राज्य सरकार कर्नाटकच्या दबावाखाली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री एक इंचही जमीन देणार नसल्याचा इशारा देत असताना महाराष्ट्र सरकार सडेतोड प्रत्युत्तर देत नाही. खरेतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वमान्य असताना त्यांचे असले बोलणे योग्य नाही. सीमाप्रश्नी दोन्ही राज्यांच्या नेतृत्वांमध्ये चर्चा झाली. पण, त्याची नेमकी माहिती बाहेर आली नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री केवळ चहा बिस्कीट घेऊन तेथून परत आले असावेत अशी खिल्लीही त्यांनी यावेळी उठविली.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला ना भूतो ना भविष्यती असा प्रतिसाद मिळत असून, राजकीय पक्षांबरोबरच सामाजिक चळवळीतील बहुतेक संघटनांनी सहभाग घेतल्याचे सांगताना यानंतर प्रत्येक राज्यात ‘हात से हात जोडो’ यात्रा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात महापुरुषांचे अवमान, गायरान गैरव्यवहार, भ्रष्टाचाराच्या मुद्यावर सरकारने चर्चा केली नाही. सरकारमधील अनेकांचे घोटाळे असून, आम्ही आणखी पुरावे शोधतोय असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र लढणार असल्याने येणाऱ्या निवडणुकीत भाजपा व त्यांच्या मित्रपक्षाचा धुवा उडणार असल्याचा विश्वास व्यक्त करत आणि म्हणूनच राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलत असल्याचा आरोपही त्यांनी केला.