राज्यात कोरोना संख्या नियंत्रणात आल्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला उलथवून टाकत शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न झाले. मात्र मागील काही दिवसांपासून चीन, अमेरिका कोरियासह अन्य देशांमध्ये कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या आरोग्य विभागाने राज्य सरकारला पत्र पाठविले असल्याची माहिती पुढे आली. या पत्राचा अनुषंगाने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला आज विधानसभेत खबरदारीचा सल्ला देत देशात लॉकडाऊन होता याची आठवण करून दिली.
चीनसह जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि अमेरिकेत कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर करोना विषाणुतील नव्या उत्परिवर्तनाची माहिती मिळवण्यासाठी दैनंदिन करोना चाचण्यांत आढळलेल्या नमुन्यांचे संपूर्ण जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) करण्याची सूचना सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारने मंगळवारी केली.
विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज बुधवारी विधानसभेत चीनमधील स्थितीचा उल्लेख करत देशात लॉकडाउन लागला होता हे विसरु नका याची आठवण करुन दिली आहे.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रासह देशाला कोरोनामुळे फार मोठी किंमत मोजावी लागली. अमेरिका आणि चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले असल्याने त्यांना लॉकडाऊन करावा लागला आहे. आपल्याकडे पहिला रुग्ण आढळला तेव्हा दुबईतून एक जोडपं आलं होतं. त्यानंतर चालकाला कोरोना झाला आणि तेथून पुढे संख्या वाढत गेली होती याची आठवण करून दिली.
जपान, चीन, कोरिया, ब्राझील या देशांमध्ये कोरोनाचे नवे उपप्रकार सापडत आहेत. कोरोनाची साथ नव्याने आलू असून चीनमध्ये गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. चीनमध्ये बेड कमी पडत असल्याने कारसारख्या वाहनांमध्ये रुग्णांना दाखल केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य सचिवांनी कोरोनाच्या नव्या उपप्रकाराची तपासणी आणि काळजी घेण्याचं आवाहन केल्याचे त्यांनी सांगितले.
आपण चीनमधील स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी हाय-पॉवर कमिटी किंवा टास्क फोर्स तसंच जगभरात काय केलं जात आहे याचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमणार आहोत का?, अशी विचारणा केली. तसेच कोरोनाच्या नव्या उपप्रकाराचा प्रसार होऊ नये यासाठी पक्ष बाजूला ठेवून, एकत्रित येत विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे आवाहनही त्यांनी केले.
कोरोना वाढल्यास संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये गेला होता याचा विसर पडू देऊ नका. सरकारनेही याबद्दल काळजी घ्यावी असा सल्लाही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला.
अजित पवार यांच्या या सल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, टास्क फोर्स किंवा समिती गठीत करु अशी घोषणा करत तुम्ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. केंद्राशी समन्वय साधण्यात येईल. टास्क फोर्स किंवा समिती तात्काळ गठीत केली जाईल, जी बदलत्या स्थितीवर लक्ष ठेवून सूचना करेल आणि आपण त्याची अंमलबजावणी करु, असे आश्वासन दिले.