गुढी पाढवा आणि रामनवमी सण अगदी तोंडावर आले तरी अद्याप गृह विभागाकडून त्याबाबतची मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली नसल्याच्या मुद्यावरून भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला टोला लगावत हिंदू सणांचा विषय आला की ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो? असा खोचक सवाल केला.
त्याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, भाजपाच्या आरोपांना उत्तर देत बसलो तर काहीच काम करता येणार नाही असा उपरोधिक टोला लगावला.
तसेच गुढीपाडवा आणि रामनवमी सणासाठी येत्या दोन -तीन दिवसात अधिसूचना काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीने पोलीसांनी मुंबईत येत्या ८ एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. येत्या २ एप्रिल रोजी गुढीपाडवा सण आहे. त्यानंतर रामनवमी येणार आहे. या दोन्ही सणांच्या निमित्ताने शोभायात्रा आणि मिरवणुकीला परवानगी देण्याची आणि निर्बंध शिथिल करण्याची मागणी भाजपाने केली.
या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना वळसे पाटील यांनी गुढीपाडवा आणि रामनवमीसाठी लवकरच अधिसूचना काढण्यात येणार असलायचे सांगितले. भाजपने केलेल्या आरोपांबाबत बोलताना वळसे पाटील यांनी भाजपच्या आरोपाना उत्तर देत बसलो तर काहीच काम करता येणार नाही, असा टोला लगावला.
शेलार नेमके काय म्हणाले
हिंदू सणांना परवानगी देण्याचा विषय आला की, ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो?, असा सवाल करीत भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज पुन्हा एकदा सरकारवर तोफ डागली
हिंदू नववर्षच्या निमित्ताने गुढीपाडव्याला निघणा-या शोभायात्रा आणि राम नवमीच्या मिरवणूका यांना परवानगी द्या, अशी मागणी भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी विधानसभेत केली होती. त्यावेळेपासून आजपर्यंत याबाबत सरकारकडून कोणत्याही स्पष्ट सूचना आल्या नाहीत. त्यामुळे आज प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार शेलार यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.
ठाकरे सरकारने गुढीपाडव्या शोभायात्रा आणि राम नवमीच्या मिरवणूकांना परवानगी देण्याची स्पष्ट भूमिका आजपर्यंत घेतली नाही. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण कायम आहे. ज्या ज्या वेळी हिंदू सणंचा विषय येतो त्यावेळी ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो ? असा सवाल त्यांनी केला. तसेच मुंबई पोलीसांनी मुंबईत १० मार्च ते ८एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले असून त्यासाठी आतंकवादी, देशविरोधी शक्ती या ड्रोन, रिमोट कंट्रोलचा वापर करून हल्ला करतील अशी माहिती पोलिसांकडे आल्याचे ते सांगत आहेत. अशी माहिती आली असेल तर त्याबाबत सुरक्षा यंत्रणांनी खबरदारी जरुर घ्यावी असेही ते म्हणाले.
