तब्बल १० दिवसानंतर मुंबईत परतलेले एकनाथ शिंदे यांनी मुंबईत उतरताच थेट देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर पोहोचले. तेथे काही काळ देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरिष महाजन यांच्याबरोबर चर्चा केली. त्यानंतर हे सर्वजण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर गेले. तेथे गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल यांच्याकडे नव्या सत्ता स्थापनेचा दावा करणारे पत्र ५० आमदारांच्या सह्याचे पत्र आणि भाजपाच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालाकडे सुपुर्द केले.
त्यानंतर राजभवनातच आयोजित पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदासाठी भाजपाच्या विधिमंडळ गटाने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर आज एकटे एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच शपथविधी होणार आहे. काही कालावधीनंतर मंत्रिमंडळ विस्तार करणार असून त्यावेळी बाकिच्यांचा समावेश करण्यात येणार आहे. मात्र या सरकारमध्ये मी सहभागी होणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केले.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मला पदाची लालसा नाही. केवळ विकासासाठी आणि बाळासाहेबांच्या हिंदूत्वासाठी ५० आमदारांनी हा निर्णय घेतला आहे. सध्याच्या राजकिय परिस्थितीत एखाद्या छोट्या संख्याबळ असलेल्या पक्षाला इतके मोठे पद कोणी देत नाही. मात्र भाजपाने माझ्यासारख्या बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदासाठी निवडले. त्याबद्दल भाजपाच्या नेत्यांचे आणि फडणवीस यांचे आभार मानतो.
नैसर्गिक युती असलेल्या पक्षासोबत सरकार स्थापन करावे यासाठी आम्ही त्यांना सातत्याने सांगत होतो. परंतु त्यांनी यागोष्टीकडे लक्ष दिले नाही. मात्र ज्यांच्याबरोबर आम्ही सत्तेत होतो. त्यांच्यामुळे आम्हाला स्थानिक मतदारसंघात, निधी वाटपात आणि इतर गोष्टीत अडचणी येत होत्या. तसेच भविष्यात त्यांच्याच विरोधात आम्हाला लढावे लागणार होते. त्यामुळे आम्ही वेगळा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपा आणि शिवसेनेत एकच समान धागा असून तो म्हणजे हिंदूत्व हा आहे. त्यामुळे समविचारी पक्षाशी युती करूनच पुढे जायला हवे असे आमचे मत आहे. यापार्श्वभूमीवर हा वेगळा निर्णय घेतला. साधारणपणे विरोधी बाकावरून सत्तापक्षाकडे कोणाचाही प्रवास सुरु होतो. परंतु आमचा सत्तापक्षाकडून विरोधक होण्याकडे प्रवास सुरु झाला होता. परंतु आता विकास आणि हिंदूत्व या दोन्ही प्रमुख गोष्टीसाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्राचा विकास गतीने होणार असल्याचेही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.