राज्यातील शिवसेनेतील बंडाळीमुळे अल्पमतात आलेल्या उध्दव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा काल राजीनामा दिला. मात्र काल मुख्यमंत्री पदाचा त्याग करत असल्याचे जाहिर करताना माझ्याऐवजी दुसरा मुख्यमंत्री शिवसेनेचाच झाला तर मला आनंदच आहे असे सांगत एकप्रकारे भाजपा आणि एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले. उध्दव ठाकरे यांच्या आव्हानाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी तोडीस तोड उत्तर दिले. एकनाथ शिंदे यांना भाजपाचे समर्थन राहणार असून त्यांचा शपथविधी आजच होणार असल्याची घोषणा करत उध्दव ठाकरेंच्या त्या आव्हानाला प्रत्युत्तर दिले.
तब्बल १० दिवसानंतर एकनाथ शिंदे हे मुंबईत आले आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या निवासस्थानी भेट घेतली. एकनाथ शिंदे यांनी भाजपा नेत्यांच्या सोबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे जावून त्यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राजभवनात आयोजित पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदासाठी भाजपा पाठिंबा देणार असल्याचे जाहिर केले. तसेच त्यांचा शपथविधी आजच संध्याकाळी ७ वाजता राजभवनात छोटेखानी समारंभात होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केले. त्यामुळे राज्यात उध्दव सरकारनंतर आता शिंदेसरकार येणार असल्याचे आता स्पष्ट झाले.
त्यानंतर एकनाथ शिंदे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, भाजपाकडे १२३ आमदारांचे संख्याबळ असताना माझ्या सारख्या छोट्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिला. आमच्याकडे ३९ आमदारांचे संख्याबळ आणि ११ छोटे पक्ष आणि अपक्ष असे मिळून ५० चे संख्याबळ आहे. तरीही मोठे संख्याबळ असलेले भाजपाने माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यावर इतका मोठा विश्वास दाखविल्याबद्दल नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो.
मला पदाची लालसा नाही. यापूर्वीही मी नगरविकास मंत्री होतोच साधारणत: राजकारणात विरोधकाकडून सत्तापक्षाकडे वाटचाल सुरु होते. मात्र आम्ही सत्तापक्षाकडून विरोधी बाकाकडे आमची वाटचाल सुरु झाली होती. ज्यांच्या विरोधात लढत होतो त्यांच्याच सोबत सत्तेत बसल्याने मतदारसंघातील अनेक छोट्या-मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होतो. मात्र बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदूत्व आणि आनंद दिघे यांची शिकवण पुढे नेण्यासाठी आम्ही वेगळा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.