Breaking News

कांद्याला हमीभाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविणार

कांदा उत्पादकांच्या शिष्टमंडळाला पणन मंत्री सुभाष देशमुख यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील कांद्यांचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कांद्याला हमी भाव द्यावा,अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीचा विचार करुन कांद्याला हमी भाव मिळावा यासाठीचा प्रस्ताव राज्य शासन केंद्र शासनाकडे पाठविणार असल्याची माहिती पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिली.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात पणन मंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेवून निवेदन दिले, यावेळी पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या शासन पाठीशी असून कांद्यासाठी शासनाने अनुदान जाहीर केले आहे. काही बाजारसमित्या शेतमालाचे दर उतरावेत म्हणून बाजार समित्या बंद ठेवत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. शेतकऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी जर बाजार समित्या बंद ठेवत असतील तर त्या बाजार समित्यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये शेतमालाचा लिलाव झाल्यानंतर व्यापाऱ्यांच्या खळ्यावर नेण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च घेवू नये, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

कांदा जीवनावश्यक वस्तुंच्या यादीतून वगळून दोन हजार रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्यावा, मार्च २०१८ पर्यंत सरसकट कर्जमाफी करुन येणाऱ्या हंगामासाठी शून्य टक्के व्याजदाराने सुलभ पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावेत, दुष्काळाबाबत तातडीने मदत शेतकऱ्यांना करावी, १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ हा अनुदान जाहीर केलेला कालावधी रद्द करुन १ नोव्हेंबर ते ३१ मार्च २०१९ पर्यंत कांद्यास अनुदान जाहीर करावे. उन्हाळी कांदा खरेदीसाठी शासनाने हस्तक्षेप करावा आदी विषयांवर शिष्टमंडळ आणि मंत्री सुभाष देशमुख यांच्यात चर्चा झाली.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *