मुंबई: प्रतिनिधी
मैत्रीचे वेगळे रूप दाखविणारा ‘ओढ’ हा चित्रपट १९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या मराठी चित्रपटाच्या संगीताचा अनावरण सोहळा नुकताच पार पडला. याप्रसंगी चित्रपटाच्या पहिल्या ट्रेलर व गीताची झलक दाखवण्यात आली. कलाकारांच्या रंगतदार लाइव्ह परफॉर्मन्सने या सोहळ्यात चांगलेच रंग भरले. सोनाली एन्टरटेन्मेंट हाऊसची प्रस्तुती तसंच एस. आर. तोवर यांची निर्मिती असलेल्या ‘ओढ’ मैत्रीतील अव्यक्त भावना चे दिग्दर्शन नागेश दरक व एस. आर. तोवर यांनी केले आहे. तरुणाईच्या ओठावर सहज रुळतील अशी श्रवणीय चार गीते यात असून हा सुरेल नजराणा प्रेक्षकांना निश्चितच आवडेल असा विश्वास निर्मात्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. तसेच उपस्थित सर्व कलाकारांनी निर्मात्यांनी दिलेल्या संधीबद्दल त्यांचे आभार मानले.
संजाली रोडे लिखित ‘निरंतर राहू दे’ हे गाणं स्वप्नील बांदोडकर, नेहा राजपाल यांनी गायले आहे. तर कौतुक शिरोडकर यांचे ‘नाचू बिनधास्त’हे धमाकेदार गाणं आदर्श शिंदे, वैशाली माडे यांनी स्वरबद्ध केले आहे. ‘ना जाने क्या हुआ है’हे अभय इनामदार यांनी लिहिलेलं गाणं रोहित राऊत व आनंदी जोशी यांनी गायले आहे. ‘जो दिल से किसी को’हे सुफी सॉंग कुकू प्रभास यांनी लिहिले असून जावेद अली यांनी ते आपल्या आर्त स्वरात गायलं आहे. संगीतकार प्रवीण कुवर यांचा संगीतसाज या गीतांना लाभला आहे.
मैत्री, प्रेम दर्शवणारी ‘ओढ’मैत्रीच्या नात्याला कोणत्या वळणावर घेऊन जाणार? याची रंजक कहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे. गणेश तोवर आणि उल्का गुप्ता ही नवी जोडी या चित्रपटातून आपल्या समोर येणार आहे. सोबत मोहन जोशी, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, शशिकांत केरकर, जयवंत भालेकर, राहुल चिटनाळे, आदित्य आळणे, सचिन चौबे, शीतल गायकवाड, तेजस्विनी खताळ, मृणाल कुलकर्णी आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. कथा व पटकथा दिनेश सिंग ठाकूर यांनी लिहिली असून, त्यांनीच गणेश कदम आणि दर्शन सराग यांच्यासोबत संवादलेखन केलं आहे. या चित्रपटाचं छायांकन रविकांत रेड्डी व संकलन समीर शेख यांनी केलं आहे.