मुंबई: प्रतिनिधी
देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक खूशखबर आहे. सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी रोजगार एक्सचेंज सुरू करणार आहे. या एक्सचेंजद्वारे ज्येष्ठ नागरिकांना नवीन नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हे एक्सचेंज १ ऑक्टोबरपासून सुरू होईल. याशिवाय सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक हेल्पलाइनही सुरू केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या समस्यांचं निराकरण या हेल्पलाइनद्वारे केलं जाईल.
देशात प्रथमच अशा प्रकारचं रोजगार केंद्र उघडलं जात आहे. रोजगार एक्स्चेंजमध्ये स्वतःची नोंदणी करून ज्येष्ठ नागरिक स्वत: साठी रोजगार शोधू शकतील. यासाठी एक पोर्टल सुरू केलं जात आहे. सामाजिक न्याय मंत्रालय सीनियर एबल सिटीजन्स फॉर री-एम्प्लॉयमेंट इन डिगनिटी नावाचं पोर्टल सुरू करणार आहे. नोकरी करण्याची इच्छा असलेले ६० वर्षापेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक या पोर्टलवर नोंदणी करू शकतात. याबाबतचं आज तक या वाहिनीने दिलं आहे.
हे एक परस्परसंवादी व्यासपीठ असेल ज्यावर भागधारक एकमेकांना प्रत्यक्ष भेटतील आणि रोजगाराच्या संधींबद्दल बोलतील, असं टाइम्स ऑफ इंडियाच्या एका अहवालात सांगण्यात आलं आहे. सामाजिक न्याय मंत्रालयाने सीआयआय (CII), फिक्की ( Ficci) आणि असोचॅम (Assocham) सारख्या उद्योग संघटनांना पत्र लिहून त्यांना ज्येष्ठ नागरिकांना रोजगार मिळवण्यास मदत करण्यास सांगितलं आहे. या पोर्टलवर ज्येष्ठ नागरिकांना त्यांचं शिक्षण, अनुभव, कौशल्य, आवडी इत्यादींची माहिती द्यावी लागेल. हे एक्सचेंज रोजगाराची हमी देत नसल्याचं मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. एखाद्या वरिष्ठांची पात्रता, त्याची गरज लक्षात घेऊन त्याला त्यांच्या नोकरीत ठेवणं ही कंपन्या आणि नियोक्त्यांची निवड असेल.
सरासरी आयुर्मानात वाढ झाल्यामुळे देशात ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांसाठी रोजगार एक्सचेंज प्रभावी ठरू शकते. एका अंदाजानुसार, देशात २०११ मध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या १०.४ कोटी झाली आहे. २००१ मध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या ७.६ कोटी होती. देशातील ज्येष्ठ नागरिकांचं प्रमाण २०५० पर्यंत एकूण लोकसंख्येच्या २० टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
जेष्ठ नागरिकंना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी सरकारने ‘एल्डर लाइन’ नावाची देशव्यापी टोल फ्री हेल्पलाइन सुरू केली आहे. १४५६७ हा हेल्पलाइन नंबर आहे. या हेल्पलाइनवर ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन, कायदेशीर समस्या, भावनिक आधार, छळाच्या विरोधात मदत, बेघर झाल्यास मदत आदी सहाय्य मिळेल.