मुंबई: प्रतिनिधी
शहर आणि उपनगराला जोडणाऱ्या उपनगरीय गाड्यांना फक्त लसीचे डोस घेतलेल्या नागरीकांसाठी मासिक आणि त्रैमासिक पास देण्यास मान्यता देण्यात येत होती. मात्र दैंनदिन तिकिट मात्र मिळत नव्हते. त्यावर नागरीकांकडून एक दिवसाच्या प्रवासासाठीही तिकीट द्या अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार अखेर आज राज्य सरकारच्या आपतकालीन विभागाने रेल्वेला पत्र लिहीत एक दिवसाच्या प्रवासासाठी तिकीट देण्याची सूचना केली.
आतापर्यंत फक्त कोविशिल्डचे दोन डोस किंवा कोवॅक्सीनचा १ डोस घेवून १४ दिवस पूर्ण झाले असतील त्यांनाच रेल्वे लोकलचा मासिक, त्रैमासिक पास देण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे एखाद्या कामासाठी आणि एका दिवसासाठी लोकलने प्रवास करावयाचे असेल त्यास रेल्वेकडून तिकीट देण्यास नकार दिला जात होता. त्यामुळे अनेक लसवंत विना तिकीटच प्रवास करत होते. यामुळे रेल्वे प्रशासनाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते. यासंबधीची माहिती रेल्वे प्रशासनाच्यावतीने राज्य सरकारला दिली.
सध्या सणा-सुदीचे दिवस असल्याने नागरीकही खरेदीच्या निमित्ताने आणि गाठीभेटीच्या निमित्ताने मुंबई शहर आणि उपनगरात येत-जात आहेत. नागरीकांची गरज आणि रेल्वे प्रशासनाचे होणारे नुकसान लक्षात घेवून अखेर राज्य सरकारने एका दिवसाचे तिकिट देण्याची सूचना केली.