मुंबई : प्रतिनिधी
मुंबई उपनगरातील मध्य रेल्वे मार्गावरील सीएसटीएम ते कल्याण १५ डब्याच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करत डोंबिवलीकर प्रवाशांच्या सेवेसाठी आजपासून १५ डब्यांच्या लोकल दाखल होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते डोंबिवली या मार्गावर १५ डब्यांच्या स्वतंत्र दोन लोकल फेऱ्या सुरू होत आहेत. मध्य रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या दुसरा रेक आल्याने ही सेवा सुरू होत आहे. त्यामुळे कल्याणकरांसोबतच डोंबिवलीकरांना दिलासा मिळणार आहे.
याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यानच्या १२ डब्यांच्या ४ फेऱ्या कमी करत १५ डब्यांच्या चार फेर्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे. ठाण्यापुढील प्रवाशांसाठी १५ डब्यांची लोकल सेवा सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. या मागणीला यश येऊन डोंबिवली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावर रविवार ३ मार्चपासून १५ डब्यांच्या लोकलच्या दोन फेऱ्या सुरू होत आहेत.
डोंबिवलीहून सकाळी ६ वाजून १४ मिनिटांनी सीएसएमटीला जाणारी १५ डब्यांची पहिली लोकल धावेल, तर सीएसएमटीहून सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी डोंबिवलीला जाणारी १५ डब्यांची पहिली लोकल असेल. या लोकलला ठाणे, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या दोन्ही लोकल सेवा वीकेन्डच्या दिवशी उपलब्ध असतील. सीएसएमटी ते डोंबिवली १५ डब्यांच्या सोमवार ते शुक्रवार २२ फेऱ्या, शनिवारी १६ फेऱ्या होतील. रविवारी एकही फेरी नसेल. डोंबिवलीहून प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली होती. या गर्दीचा भार कल्याण, कसारा आणि कर्जत या लोकलवर पडत होता. त्यामुळे गर्दीचे विभाजन करण्यासाठी ६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मध्य रेल्वेवर १५ डबा लोकल फेऱ्यांचा विस्तार करण्यात आला आहे.