नागपूर : प्रतिनिधी
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था खराब झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र राज्यातील खून-१३.४९ टक्के, बलात्कार ३.६ टक्के, दरोडा २.४३ टक्के, सोनसाखळी गुन्ह्यात २.९३ टक्क्याने घट झाली असून फक्त गहाळ वस्तूंच्या तक्रारी चोरी या सदरात घेतल्याने चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच महाराष्ट्र गुन्ह्याच्या बाबत देशात १३ व्या स्थानावार असून शरीरासंबधीच्या गुन्ह्यात देशात १९ व्या स्थानावर असून गुन्हेगारांना शिक्षेच्या प्रमाणातही पूर्वीच्या तुलनेत वाढला असून तो ३४ टक्क्यावर पोचल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
विधानसभेत विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी वरील उत्तर दिले.
राज्य सरकारकडून विशेषत: पोलिसांकडून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रतिबंधकात्मक उपाययोजना करण्यात आली आहे. त्यामुळे गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. मात्र महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत विशेषत: विनयभंगाच्या गुन्ह्यात वाढ झाली असून त्यास केवळ विनयभंगाची व्याख्या व्यापक करण्यात आल्याने ही वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
अनुसूचित जातींवरील गुन्ह्याच्या प्रकरणातही २०१६ साली घट झाली असून २०१७ साली ही संख्या १२० ने घटली. तर २०१३ सालच्या तुलनेत १२३ ने घट झाली. तसेच लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटनातही १२.८ टक्क्याने घट झाली असून ज्येष्ठ नागरीकांच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. मात्र सर्वाधिक गुन्हे सायबर क्राईममध्ये वाढले असून त्यास जनजागृतीची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. कोथळे प्रकरणातील पोलिसांना बडतर्फ करण्यात आलेय. तसेच नक्षलवादी कारवायांना आळा घालत ६७ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आलीय. तर १७ शरण आले असून ७ ठार मारल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांसाठी घरे बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून ४७ हजार ५६२ घरांचे काम विविध टप्प्यावर आहे. तसेच पोलिसांना स्वत:च्या मालकीची घरे घेण्यासाठी पगाराच्या २०० टक्के जास्त अंग्रीम मंजूर करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय खडसे यांच्या प्रकरणी एसीबीकडून पुढील कारवाई सुरु असून कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे खडसे यांचा मंत्रिमंडळ प्रवेशाची शक्यता संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले.
मुन्ना यादवला जेव्हा व्हायची तेव्हा अटक होईल
मुन्ना यादव गुन्हेगार असेल तर त्याच्यावर कारवाई होईल. त्यांला जेव्हा व्हायची असेल तेव्हा अटक होईल असा खुलासा मुख्यमंत्री फडणवीस यांनी करत गुन्हे घडत आहेत. मात्र त्याला आळा घालण्याचे कामही सुरु असल्याचे सांगत मुन्ना यादव प्रकरणी थेट कोणतेही भाष्य करण्याचे मुख्यमंत्र्यांनी टाळले.
नितीन आगे प्रकरणी फितुरांवर कारवाई
याप्रकरणात उच्च न्यायालयात अपील करत असून साक्षीदारांनी दिलेल्या जबानी फिरविल्याबाबत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच याप्रकरणासाठी चांगल्यातला चांगला गुन्हे विषयातला वकीलही देण्यात येणार आहे.
अखेर राष्ट्रगीताने हिवाळी अधिवेशनाची सांगता झाली.