मुंबईः प्रतिनिधी
कोरेगाव भिमा येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ काल बुधवारी दलित संघटनांसह डाव्या पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद पुकारला होता. त्यानंतर छात्र भारतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय छात्र समेंलनाला गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि दिल्लीच्या जेएनयुचा विद्यार्थी उमर खालीद यांना आमंत्रित केल्याने त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारत छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे.
छात्र भारतीच्या जवळपास २७ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली असून विले-पार्ले येथील नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी जे कार्यकर्त्ये येतील त्यांना अटक करण्याचे पोलिसांनी सुरु केले आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या जिग्नेश मेवाणी, उमर खालीद यांच्या विरोधात सर्च वारंट काढण्यात आले आहे. तर अलाहाबाद विद्यापीठाच्या रिचा सिंग यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांकडून दडपशाही करण्यात येत असली तरी हा कार्यक्रम निर्धारीत वेळेत होणारच असा निर्धार छात्र भारतीच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान छात्र भारतीचे प्रमुख आमदार कपिल पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी जुहू पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
दरम्यान, पुणे येथील शनिवार वाड्यावर आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी जिग्नेश मेवाणी आणि उमर खालीद यांच्यावर पुणे पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि राजकिय आंदोलने होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.