औरंगाबाद : प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या तूर खरेदीचा घोळ गेल्या वर्षी प्रमाणे यंदा देखील मोठ्या प्रमाणावर राज्यात सुरु आहे. खरेदीची मर्यादा आणि दरामधील तफावत यामुळे शेतकऱ्यांचे खरेदी केंद्रावर खडके उडत आहेत. शुक्रवारी औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तूर खरेदी केंद्रावर दहा शेतकऱ्यांनी आणलेली तूर चाळण न करता रिजेक्ट करण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावरच तूर जाळून निषेध केला. परिणामी खरेदी केंद्र काही काळ बंद ठेवण्यात आले होते.
पाच फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या तुर खरेदी केंद्रावर आतापर्यंत ३१४ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली. तर २१८ क्विंटल एवढी तूर खरेदी करण्यात आली. शुक्रवारी वरुड काझी, वरझडी, टोणगाव, पिंप्री, शामवाडी येथील दहा ते बारा शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर तूर आणली होती. यापैकी तीन शेतकऱ्यांची तूर निकषात बसल्यामुळे खरेदी करण्यात आली. तर इतर शेतकऱ्यांच्या तुरीला भुंगा, हिरवे दाणे, मुकण्या आदी कारणांमुळे नाकारण्यात आले.
शेतीमालाला भाव नसल्यामुळे राज्यात विशेषतः मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतांना तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा छळ होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. वरुड काझी येथील शेतकऱ्यांनी गोंधळ घालत निषेध व्यक्त करत सोबत आलेली तूर खरेदी केंद्राबाहेर जाळली. या गोंधळामुळे खरेदी केंद्र बंद करण्यात आले होते.
हा प्रकार समजताच जिल्हा मार्केटिग अधिकारी सी.डी.खाडे, गुणवत्ता विभागाचे गुणनियंत्रक विनय डक आदींनी धाव घेत शेतकऱ्यांची समजूत काढली. नाकारण्यात आलेल्या तुरीची सर्वासमोर पुन्हा तपासणी केली. यात पुन्हा काही शेतकऱ्यांची तूर खराब असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, जालना येथील खरेदी केंद्रावर तुरीची चाळण करून मगच ती खरेदी केली जाते.