मुंबई : प्रतिनिधी
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने मिळावी यासाठी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार यांनी आज विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेत खरीप २०१७ मधील योजनेत सहभागी शेतकऱ्यांना भात ,मूग ,उडीद, सोयाबीन पिकांच्या नुकसानभरपाईची रक्कम आठवडाभरात त्यांच्या बँक खात्यात जमा करावी असे आदेश दिले.
या आढावा बैठकीस ओरिएंटल इन्श्युरन्स, युनायटेड इंडिया इन्श्युरन्स, अग्रीकल्चर इन्श्युरन्स कंपनी ऑफ इंडिया, नॅशनल इन्श्युरन्स कंपनी, रिलायन्स जनरल या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दोन आठवड्यांपूर्वी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी याबाबत आढावा बैठक घेतली होती. त्याबाबत पाठपुरावा करण्यासाठी अपर मुख्य सचिवांनी पाचही विमा कंपन्यांच्या प्रतिनिधिंची बैठक घेतली.
विम्या कंपन्यांना पीक उत्पादकते विषयी सर्व आकडेवारी उपलब्ध करून दिली आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम तत्काळ जमा करण्यात यावी. बँकांमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यांबाबत ताळमेळ घालून रक्कम वितरीत केली जात असल्याचे विमा कंपन्याच्या प्रतिनिधींनी सांगितले.
आपले सरकार केंद्रावरून नोंद झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याशी आधार जोडणी करण्यात आली आहे. अशा खात्यांचे ताळमेळ करताना जास्त वेळ लावू नका त्यांच्या खात्यात तातडीने रक्कम जमा करा अशा स्पष्ट सूचना अपर मुख्य सचिवांनी केल्या आहेत. खरीप २०१७ मध्ये सुमारे ८१ लाख शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत. त्यातील सुमारे ८ लाख शेतकऱ्यांनी आपले सरकार केंद्राच्या माध्यमातून नाव नोंदणी केली आहे. या आठवड्यातच त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करावी, असे आदेशही त्यांनी दिले.