मुंबई : प्रतिनिधी
कृषी संशोधन आणि विस्ताराच्या क्षेत्रात आपली कृषी विद्यापीठे उत्कृष्ट काम करत आहेत. मात्र, शेतीबाबत कोणतेही औपचारीक शिक्षण न घेतलेले अनेक शेतकऱ्यांनी विद्यापीठांपेक्षाही अधिक चांगले संशोधन केले आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी काढले.
दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्यावतीने रवींद्र नाट्य मंदिर येथे काल आयोजित ‘११ व्या सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार’ वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. राज्याचे पशुसंवर्धन,दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक एम.एस. थॉमस, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. ए. टी. शेरीकर,डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. ए. जी. सावंत, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी संचालक (विस्तार शिक्षण) डॉ.व्ही.के.महोरकर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सी. डी. मये, ‘यशदा’ मधील सहाय्यक प्राध्यापक श्रीमती उज्ज्वला बानखेले आदी याप्रसंगी उपस्थित होते.
राज्यपाल राव यांनी आपल्या भाषणाची सुरूवात मराठीमध्ये केली, ते म्हणाले दूरदर्शन ‘सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार’ प्रदान सोहळ्याच्या माध्यमातून देशाच्या अन्नदात्याचा सन्मान करीत असल्याबद्दल मला विशेष आनंद होत आहे. देशाची ६० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. असे असले तरी शेतीशी संबंधित कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या वाहिन्या खूप कमी आहेत. मात्र, दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी शेतकऱ्यांशी बांधिलकी ठेऊन कार्यक्रम तयार करतात. आजही डीडी-सह्याद्री केवळ शेतक-यांसाठी विशेष कार्यक्रम चालवते हे उल्लेखनीय आहे. सह्याद्री वाहिनीने कृषी, फलोत्पादन क्षेत्रात मोलाचे कार्य केलेल्यांना सर्वांसमोर आणण्याचे काम केले आहे, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, प्रसिद्ध चीनी प्रवासी हुआन त्सांग यांनी महाराष्ट्राला इ.स. पूर्व ६४० ते ६४१ भेट दिली होती. त्यावेळी येथील समृद्ध कृषी संस्कृतीबद्दल गौरव केला. मात्र ब्रिटीश शासन काळात भारतातील शेती आणि उद्योग नष्ट करण्याचे काम केले. भारतीय शेतकऱ्यांना दारिद्र्यात लोटले. स्वातंत्र्यानंतर आपल्या दूरदृष्टीच्या नेतृत्वांनी शेतीला अग्रक्रम दिला.१९४६ ते १९५२ च्या दरम्यान दरवर्षी सुमारे ३० लाख टन अन्नधान्याची आयात करावी लागत होती. आपल्या कृषी शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे आपण आज अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहोत.
आज आपण अन्नधान्य, फळे, भाजीपाला, दूध, अंडी आणि मत्स्योत्पादनात आज अग्रेसर आहोत. अनेक फळे उत्पादनात संपूर्ण जगात आघाडीवर आहोत. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आपल्या देशात अन्नधान्याचे २०१७-१८ मध्ये २७९.५ दशलक्ष टन विक्रमी उत्पादन नोंदवले गेले आहे. असे असले तरी अनेक सीमांत शेतकरी अजूनही गरिबीत आहेत. या विसंगतीची दखल घेऊन प्रधानमंत्री यांनी २०२३ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी व्यापक कार्यक्रम हाती घेतला आहे.
दिवंगत दादाजी रामजी खोब्रागडे यांचा उल्लेख करुन राज्यपाल पुढे म्हणाले, केवळ दीड एकर शेतीमध्ये संशोधन करुन त्यांनी प्रसिद्ध एचएमटी तांदळासह तांदळाच्या विविध जाती विकसीत केल्या. त्यांच्या अनन्यसाधारण कार्यामुळे त्यांचे नाव जगात पोहोचले. ते पुढे म्हणाले, कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देण्याची गरज असून मधमाशा पालन, रेशीम उद्योग,कुक्कुटपालन, मेंढी व शेळी पालन, वराह पालन सारख्या पूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे.
सर्व पुरस्कारार्थ्यांना लॅपटॉप
एका संस्थेमार्फत पुरस्कारार्थ्यांना लॅपटॉप बॅग वितरीत करण्यात आल्या. त्याचा धागा पकडून सर्व पुरस्कारार्थ्यांना राजभवनच्यावतीने लॅपटॉप देण्याची घोषणा राज्यपाल श्री. राव यांनी यावेळी केली.
पदूम मंत्री महादेव जानकर यावेळी म्हणाले, राज्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन फलोत्पादन, फुले, भाजीपाला उत्पादन याबरोबरच पशुपालन, दूध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसायसारख्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत आहेत. त्यांना राज्य शासन विविध सुविधा उपलब्ध करुन देत आहे. जलयुक्त शिवार योजनेतून राज्यात आतापर्यंत १६ लाख ८२ हजार टीसीएम इतका प्रचंड पाणीसाठा तयार झाला असून कृषी उत्पादनामध्ये वाढ झाली आहे.
ते पुढे म्हणाले, पशुसंवर्धन विभागाच्या उत्कृष्ट कार्यामुळे राज्याला या क्षेत्रात पहिला क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. राज्यात साडेचार हजार पशुवैद्यकीय दवाखान्यांपैकी १ हजार ८१ दवाखान्यांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. दुर्गम भागासाठी ३४९ फिरते पशुवैद्यकीय दवाखाने सुरू करण्यात येत आहेत. चारायुक्त शिवार, स्वयंम प्रकल्प, नीलक्रांती आदी योजनांमुळे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसायाला चालना देण्यात येत असून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी राज्य प्रयत्नशील आहे.
कृषी विकासाच्या १२ वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल हे पुरस्कार देण्यात येतात. २०१८ साठीचे पुरस्कार पुढीलप्रमाणे :
1. संजय शिंदे, नेकनूर (ता. जि. बीड) : जल व्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट काम
2. ब्रह्मादेव सरडे, मु. पो. सोगाव (पूर्व), ता. करमाळा (जि. सोलापूर) : शेतीक्षेत्रात उत्कृष्ट संशोधन कार्य
3. दत्तात्रय गणपतराव गुंडावार, मु.पो.ता. भद्रावती (जि. चंद्रपूर) : शेतीमधील उत्कृष्ट नाविन्यपूर्ण कार्य
4. ईश्वरदास धोंडिबा घंघाव, डोंगरगाव, ता. बदनापूर (जि. जालना) :कृषी प्रक्रिया क्षेत्रामध्ये ग्रामीण भागात उत्कृष्ट काम
5. बाळासाहेब गिते, मराठवाडा ॲग्रो प्रोसेस फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. कळंब (जि. उस्मानाबाद) : पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य
6. अशोक राजाराम गायक, वंदेवटा फार्म, खांदेप येथे, ता. कर्जत, जि. रायगड (मत्स्यव्यवसाय विकासातील उत्कृष्ट काम)
7. शरद संपतराव शिंदे, खडक मालेगाव, ता. निफाड (जि. नाशिक) : फुले, फळे आणि भाजीपाला लागवडी मध्ये उत्कृष्ट कार्य
8. लक्ष्मण जनार्दन रास्कर, पोस्ट मरीआईची वाडी, ता. खंडाळा, जि. सातारा (फुले, फळे आणि भाजीपाला लागवड)
9. श्रीमती विद्या प्रल्हाद गुंजकर, मु. पो. ता. मेहकर (जि. बुलढाणा) : सामाजिक वनीकरणात उत्कृष्ट काम
10. सुधाकर मोतीराम राऊत, गावंधळा, ता. खामगांव (जि. बुलढाणा) : मधमाशी पालन, रेशीम शेती, कुक्कुटपालन, मेंढी शेळी पालन, कृषी पर्यटन आदी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य.
11. ताराचंद चंद्रभान गगरे, तांबेरे, ता. राहुरी (जि. अहमदनगर) :कृषी विस्ताराच्या क्षेत्रातील उत्कृष्ट काम
12. श्रीकृष्ण सोनुणे, प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, ता. जि. जालना : कृषी विस्ताराच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारी संस्था