मुंबई : प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांना जमिन अधिग्रहणाच्या बदल्यात मिळालेली नुकसान भरपाई आणि गिरासेला मिळालेली भरपाई यांच्या फरक आहे. तो कशामुळे झाला याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच दिले असून त्यानुसार यात दलाली करणाऱ्यांची निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
विधानसभेत २९३ अन्वयेखाली सत्ताधारी आणि विरोधकांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. या प्रस्तावावर राधाकृष्ण विखे-पाटील, अजित पवार, जयदत्त क्षिरसागर, अजित पवार, जयंत पाटील, डॉ.अनिल बोंडे, सुभाष साबणे यांच्यासह अनेक सदस्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले.
धर्मा पाटील यांची जमिन २००४ साली नोटीफाय करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना कमी मानधन मिळाले. त्याचबरोबर त्यांच्या जमिनीचा पंचनामा करण्यात आला त्यावेळी त्यांच्या ५ एकर जमिनीवर फक्त आंब्याची रोपे असल्याची नोंद होती. त्यामुळे त्याची नुकसान भरपाईची रक्कम त्याप्रमाणेच निर्धारीत करण्यात आल्याचे सांगत कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यावर धर्मा पाटील यांची सही असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनी मुद्दा त्यावर रोपे होती का? आंब्याची झाडे होती ?हा नसून धर्मा पाटील यांच्या शेजारी असलेल्या गिरासे यांच्या जमिनीला १ कोटी ८९ लाख रूपयांची नुकसान भरपाई मिळते. तर पाटील यांना कमी रक्कम कशी मिळते हा प्रमुख मुद्दा आहे. त्यामुळे याप्रकरणात कोण दलाल सहभागी आहे ? याची चौकशी करणार का? असा प्रश्न उपस्थित केला.
त्यावर मंत्री बावनकुळे म्हणाले की, याबाबत निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत त्या दलालांची चौकशी करण्याचा निर्णय झाला आहे.
तसेच धर्मा पाटील यांना जवळपास २६ लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार असून २००४ ते २०१७ या कालावधीसाठी १२ टक्के व्याजही प्रति वर्षाच्या अनुषंगाने देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.